HW News Marathi
महाराष्ट्र

आगामी सण, उत्सव शांततेत व सलोख्याने साजरे व्हावेत – जिल्हाधिकारी काकाणी

उत्तम बाबळे

नांदेड – नांदेड शहरासह, जिल्ह्यात आगामी काळातील सण, उत्सव शांतता व सलोख्याने साजरे व्हावेत. त्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे. नागरिकांनीही याकाळात आरोग्य, स्वच्छता यांची काळजी घ्यावी. अफवांवर विश्वास ठेवू नये.तसेच प्रसंगी नियंत्रण कक्षांशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी जिल्हा शांतता समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे संपन्न झालेल्या बैठकीत आज केले.

बैठकीस महापौर शैलजा स्वामी, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप कर्णीक, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, मनपा उपायुक्त रत्नाकर वाघमारे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बी. पी. कदम, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी डाॅ. वाय. एच. चव्हाण, तहसीलदार किरण अंबेकर तसेच महावितरण, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आगामी सण, उत्सव यासाठीच्या विविध विभागांच्या तयारीचाही सर्वंकष आढावा घेतला. ते म्हणाले की, सण, उत्सव मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरे केले जातात. पण दिवस तीव्र उन्हाळ्याचे आहेत. त्यामुळे उत्साहाच्या भरात आरोग्याकडे दुर्लक्ष, त्यातून शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे याकाळात वेगवेगळ्या ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, त्यासाठी काही घटकांनी स्वयंस्फुर्तीने पुढे यावे, असे प्रयत्न व्हावेत. मिरवणुकांच्या मार्गावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. मिरवणूक मार्गांसह, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणचा वीज पुरवठा अखंडीत राहील याकडे लक्ष दिले जावे. मिरवणूक मार्गावरील राडा-रोडा हटविण्यात यावा, खड्डे बुजविण्यात यावेत, साफ-सफाई करण्यात यावी. आरोग्य विभागाने रुग्णवाहिका, आवश्यक औषधे यांच्या उपलब्धतेबाबत दक्षता घ्यावी. या काळात पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तरीही स्वयंशिस्त ही बाब महत्त्वाची आहे. त्याची सुरवात प्रत्येकांने स्वतःपासून सुरवात करावी.

अप्रिय घटना टाळण्यासाठी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच या काळात जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस, महानगरपालिका, अग्नीशमनदल यांचे नियंत्रण कक्ष सदैव सतर्क राहतील, असेही सांगितले.

महापौर स्वामी यांनीही पवित्र सण, उत्सव साजरे करताना नागरिक नेहमीच प्रशासनाला सहकार्य करीत असतात, ही परंपरा याहीवर्षी अखंडीत राहील. सण-उत्सव शांततेत साजरे होतील, असा विश्र्वास व्यक्त केला.

पोलीस अधीक्षक कर्णीक म्हणाले की, जिल्ह्यात आणि शहरात सण, उत्सव शांततेत साजरे करण्याची चांगली परंपरा आहे. तरीही पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताच्या दृष्टीने सर्वोतोपरी तयारी केली आहे. अधिकचे पोलीस बळ आणि विविध साधनसामुग्री, उपाय योजना याद्वारे सज्जता ठेवण्यात आली आहे. तहसिलदार अंबेकर यांनीही उत्सव काळात पोलीसांशी सातत्यपुर्ण समन्वय राहील. पोलीस स्थानक निहाय संपर्क अधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती केल्याची माहिती दिली. यावेळी शांतता समितीच्या सदस्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. निवासी उपजिल्हाधिकारी कारभारी यांनी बैठकीचे संयोजन केले. अप्पर पोलीस अधीक्षक डोईफोडे यांनी आभार मानले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…ST कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात कशी झाली वाढ?

News Desk

…तर बाळासाहेबांनी एक थोबाडीत मारली असती!; चंद्रकांत पाटलांची राऊतांवर बोचरी टीका

News Desk

नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, चंद्रकांत पाटलांची राज्यपालांकडे मागणी

News Desk