HW News Marathi
महाराष्ट्र

पंढरपूरच्या पवित्र चंद्रभागा नदीत ड्रेनेजचं पाणी

भाविकांतून संतापाची लाट

अभिराज उबाळे

पंढरपूर – करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरीच्या चंद्रभागा नदीमध्ये शहराच्या ड्रेनेजचे पाणी गेल्याने भाविकांमधून संतापाची लाट उसळलीय. आज सकाळीच भक्त पुंडलिक मंदिराजवळ चेंबर फुटून मैलामिश्रित पाणी नदीत जात होते . तब्बल चार तासांनी नगरपालिकेच्या आरोग्य खात्याने हे पाणी बंद केले. पण तो पर्यंत साऱ्या नदीत हे दूषित पाणी मिसळले होते. ७ एप्रिल रोजी चैत्री एकादशी आहे . दोन एप्रिलपासून या एकादशीला पाच ते सात लाख भाविक पंढरीत येतात . यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हे ड्रेनिज चे पाणी थांबवण्याची मागणी होत आहे

भारताची दक्षिण काशी म्हणून पंढरपूरची ओळख आहे. विठूरायाचे दर्शन हे चंद्रभागेत अभ्यंग स्नान करूनच घेतले जाते. पण प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पवित्र चंद्रभागेची गटारगंगा झालीय. मानवी मैलामिश्रित ड्रेनेजच्या पाण्यातच भाविकांना स्नान करावे लागत आहे. आणि हेच पाणी भाविक मोठया श्रद्धेने तीर्थ म्हणून पितात. घरी देखील घेऊन जातात .

चंद्रभागेच्या किनाऱ्यावर पंढरपूर नगरपालिकेचे १५ ते २० ड्रेनेजचे चेंबर आहेत . वारंवार या चेंबरमधून चंद्रभागेत मैलामिश्रित पाणी जाते. भाविकांनी अनेक वेळा याबद्दल आंदोलने केलीत , निवेदने दिलीत . चार प्रमुख यंत्रांच्या बैठकीत यावर चर्चा देखील होते . पण या जटिल समस्यांवर अद्याप तोडगा निघाला नाही . काहीवेळा तर यात्रेच्या काळातच ड्रेनेजचे चेंबर फुटल्याने पाणी नदीत आहे . नदी किनाऱ्यावर नगरपालिकेची सार्वजनिक शौचालये आणि मोठ्या मठांची शौचालये आहेत . या शौचालयांच्या ड्रेनेजचे पाणी नदीत येते असा कायमचा अनुभव आहे . ज्या चंद्रभागा नदीच्या वाळवंटातुन संतांनी समतेचा संदेश साऱ्या विश्वाला दिला त्या वाळवंटाची तर हागणदारी झालीय .

भाजप सरकारने नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि चंद्रभागा हि योजना जाहीर केली . अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात २० कोटींची तरतूद केली . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ देखील करण्यात आला . एक वर्ष लोटले तरी या योजनेला मूर्त स्वरूप आलेलं नाही . ड्रेनेज मधून वाहणाऱ्या पाण्याचा कायमचा बंदोबस्त व्हावा यासाठी पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी देखील ६२ कोटी रुपयांची घोषणा केली . पण ना तो निधी आला ना घाण पाण्याचा बंदोबस्त झाला . राज्य सरकारने वारकऱ्यांना देखील आश्वासनांचे गाजरचं दिले असा आरोप आता वारकरी करू लागलेत . नदी किनाऱ्याचे सर्व ड्रेनेज कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी आता भाविकांमधून होत आहे .

” चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे ” ” हेच लाभो मज जन्मजन्मांतरी ” नाही श्रीहरी मागणे दुजे ” या भावनेने पंढरीत येणाऱ्या भाविकांना स्वच्छ , निर्मल आणि पवित्र अशा चंद्रभागेत कधी स्नान करता येणार कि हे एक स्वप्नच राहणार.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, तुटेपर्यंत ताणू नये!” – अनिल परब

News Desk

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग, कारण अद्याप अस्पष्ट

News Desk

देवेंद्र फडणवीस आता महाविकासआघाडी सरकारमधील ‘या’ नेत्यावरही हक्कभंग दाखल करणार

News Desk