HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात १ लाख ६३ हजार मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहेत. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. १ ते ५ एप्रिल २०२० या पाच दिवसात राज्यातील ६५लाख ५९ हजार ९५६ शिधापत्रिका धारकांना तब्बल १६ लाख ३७ हजार ८३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत २ रुपये किलो दराने प्रति कार्ड १५ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रति कार्ड २० किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते. तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रु. किलो दराने प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रु. किलो दराने प्रति व्यक्ती २ किलो तांदूळ दिला जातो.

राज्यात या योजनेमधून सुमारे ९ लाख १२ हजार २३२ क्विंटल गहू, ७ लाख १३ हजार ५४७ क्विंटल तांदूळ, तर ८ हजार ४३८ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ३ लाख ३४ हजार ७४७ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहेत त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रति लाभार्थी प्रति महिना ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्यासोबत त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त मोफत तांदूळ देण्यात येत आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रति व्यक्ती ५ किलो तांदूळ दि. ३ एप्रिलपासून कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर योजनेकरिता तांदळाचे ३लाख ५० हजार ८२ मे.टन नियतन भारतीय खाद्य निगमकडून प्राप्त करून घेतले जात आहे. दि. ३ एप्रिल पासून पात्र लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वितरण सुरू करण्यात आले आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जून मध्ये सुध्दा त्या त्या महिन्यात उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध!– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

धनंजय मुंडेला संपविण्याचा प्रयत्न, नवीन आलेले भाऊ विष कालवत आहेत ! 

News Desk

वाधवान बंधूंना १० मेपर्यंत सीबीआयची कोठडी

News Desk