HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास तुम्हांला माहितीये का ?

मुंबई | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांचा आज (22 जुलै) वाढदिवस. राजकारणातील हे असे दोन दिग्गज नेते की एकमेकांच्या अगदी परस्पर विरोधी विचारसरणीचे दोन वेगवेगळ्या पक्षांची धुरा सांभाळणारे हे नेते. देवेंद्र फडणवीस यांना अगदी पहिल्याच प्रयत्नात मुख्यमंत्रीपद मिळालं तर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावे लागले,असे हे दोन दिग्गज चेहरे. मोकळं-ढाकळं व्यक्तिमत्व, रांगडा गडी, न पटणारं वय, असं सरळ वर्णन अजित पवार यांचं करावं लागेल. तर दुसरीकडे फडणवीस या भाजपच्यायुवा नेत्याने मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यावर अल्पावधीतच लोकप्रियता तर मिळवलीच, मात्र दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची मर्जी संपादन केली. या दोन्ही व्यक्तिमत्वांना अवघा महाराष्ट्र जवळून ओळखतो.

अजित पवार आणि देवेंद्र फडणविसांचा राजकारणात प्रवेश कधी झाला?

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वयात साधारण 10 वर्षांचा फरक आहे. अजित पवार यांनी 1991 ला राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला ते बारामतीचे खासदार म्हणून निवडून आले. पण त्याचवेळी केंद्रात संरक्षण मंत्री झालेल्या काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून ते आमदार झाले.

देवेंद्र फडणवीस त्याच दरम्यान म्हणजे 1992 मध्ये कायद्याची डिग्री घेऊन कॉलेजातून बाहेर पडले होते. त्याचवर्षी ते नागपूरमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे ते नागपूरचे महापौरही झाले. म्हणजे दोघांची राजकाणातली एन्ट्री एकाच कालावधीमध्ये झाल्याचं लक्षात येत. तेव्हा अजित पवार यांना शरद पवार याचं पाठबळ लाभलं, देवेंद्र फडणवीसांना तसं कुणाचं पाठबळ लाभलं नाही. जरी असं असलं तरी अजित पवार यांनी त्यांच्या कामाचा वेगळा असा ठसा उमटवला आहे.

अजित पवार -देवेंद्र फडणवीस शपथ विधी

आपण महाराष्ट्राने पाहिलेला ऐकलेला किस्सा त्या पासून सुरवात करणार आहोत .आतापर्यंत कायम एकमेकांच्या विरोधात राजकारण करणारे ,एकमेकांवर टीकाटिप्पणी करणारे हे दोन्ही नेते अचानक एकत्र आले. नुसते एकत्र आले नाही तर सर्वांच्या नकळत पहाटेच्या वेळेत राजभवनावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. 22 ते 27 नोव्हेंबर 2019 या दरम्यानचे 80 तास महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत वेगळं आणि राजकीय भूकंप आणणारे ठरले.

इथून पुढे दोन्ही नेत्यांच्या राजकारणाकडे पाहाण्यासाठी किंवा त्याचा अर्थ लावण्यासाठी त्या 80 तासांचा मापदंड म्हणून उपयोग केला जात आहे.त्या 80 तासांच्या घटनेनंतर अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा विरोधी पक्षनेते झाले. गेल्या सहा-सात महिन्यांमध्ये ते अनेकवेळा एकमेकांच्या समोरासमोर आलेत.पण या फसलेल्या प्रयोगानंतर दोन्ही नेत्यांना आवघडल्या सारखं वाटलं. नंतर देवेंद्र फडणवीसांनी तर तो निर्णय चुकला होता असं सुद्धा म्हटलं.”आज मागे वळून पाहिलं तर मला वाटतं की तो निर्णय चुकला होता, पण त्यावेळी मी कनव्हिन्स होतो,” असं पहाटे शपथ घेतलेल्या सरकारबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राजू परुळेकर यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

फडणविसांचा राजकीय प्रवास

नव्वदच्या दशकात राजकारणात प्रवेश केलेल्या देवेंद्र फडणवीसांना तसा घरातून राजकारणाचा वारसा होताच. देवेंद्र यांचे वडील गंगाधरराव फडणवीस जनसंघाचे नेते होते. युतीच्या पहिल्या सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असलेल्या शोभाताई फडणवीस देवेंद्र फडणवीसांच्या काकू. नव्वदच्या दशकात नागपूरचे महापौरपद सांभाळल्यानंतर ते 1999 मध्ये विधानसभेवर पहिल्यांदा निवडून आले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री होण्यापूर्वी प्रशासकीय कामकाजाचा त्यांचा अनुभव केवळ महापौरपदापुरता मर्यादित होता. त्यांनी कुठलेही मंत्रिपद सांभाळले नव्हते. पाच वर्षांनंतर, फडणवीस नागपूर महानगरपालिकेचे सर्वात तरुण महापौर झाले आणि ते भारताच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचे नगराध्यक्ष झाले. 1999 ते महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत नागपूरचे प्रतिनिधित्व करीत आहेत.2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस यांना पक्षाचे केंद्रीय निरीक्षक, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जगत प्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपच्या आमदारांनी पक्षाचे नेते म्हणून निवडले.विधानसभेतील सर्वात मोठ्या पक्षाचे नेते म्हणून 31 ऑक्टोबर 2014 रोजी फडणवीस यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.नोव्हेंबर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी 23 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवारांच्या मदतीने सरकार स्थापन केले; तथापि, हे सरकार फक्त काही दिवस टिकले.

अजित पवारांचा राजकीय प्रवास

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी हे अजित पवारांच मूळगाव आहे. तर देवळालीमध्येच त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण करून, अजित पवार यांनी 1982 साली राजकारणात प्रवेश केला. त्यावर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली.पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी 1991 साली त्यांची निवड झाली. 16 वर्ष ते त्या पदावर होते. आणि 1991 साली सर्व प्रथम अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवार पी.व्ही. नरसिम्हा राव सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाले.

त्यानंतर 1995, 1999, 2004, 2009 आणि 2014 असे सलग पाच वेळा ते विधानसभेवर निवडून गेले.

पुढे 1995 साली युतीचे सरकार आले. त्यानंतर 1999 साली पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले. तर विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. ऑक्टोंबर 1999 ते डिसेंबर 2003 पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते. डिसेंबर 2003 ते ऑक्टोंबर 2004 या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याता अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.त्यानंतर आघाडी सरकार पुन्हा सत्तेवर आले तेव्हा जलसिंचन खाते त्यांच्याकडेच होते. 2004 साली त्यांना पुण्याचे पालकमंत्री बनवण्यात आले. 2014 पर्यंत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते. त्यानंतर आता त्यांच्याकडे राज्याच उपमुख्यमंत्री पद आहे.या दोन्ही नेत्यांच्या नात्यात काही महत्त्वाचे टप्पे आले, जेव्हा ते एकमेकांच्या समोरासमोर उभे ठाकले गेले, कधी एकमेकांना साथ दिली तर कधी एकमेकांपासून दूर गेले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इम्तियाज जलील यांची एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड

News Desk

“14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा?”, भाजपचा सवाल

News Desk

शरद पवारांवर राजकीय वर्तुळातून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव!

News Desk