HW News Marathi
महाराष्ट्र

BJP Vs ShivSena: राऊत आणि सोमय्यांच्यातील वाद शिगेला!

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली असल्याचं दिसून येत आहे. सत्ताधारी शिवसेना पक्ष आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. रोज या दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडताना पाहायला मिळतात. विशेषतः भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे.

शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षातील नेते दररोज पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर कुरघोडी करताना दिसून येत आहेत. अशातच आज पुन्हा एकदा संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. मात्र यावेळी सोमय्यांवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली. राऊतांनी शिवीगाळ करत सोमय्यांना सुनावलं आहे. तर राऊतांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर लगेचच सोमय्यांनी देखील त्यावर प्रतिक्रिया देत राऊत आणि शिवसेनेला टोला लगावला आहे. तसेच उद्या मी पत्रकार परिषद घेणार आहे, असेही यावेळी सोमय्यांनी सांगितले आहे. 

“एकदाच शिव्यांची डिक्शनरी द्या, उगाच माझ्या आईला संताप नको” – सोमय्या 


संजय राऊत यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर किरीट सोमय्या देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. सांताक्रूझ पोलीस ठाण्यात सोमय्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून आज सोमय्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तेची पाहणी सोमय्यांनी केल्याने समन्स बजावण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. याचसाठी ते आज पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना सोमय्या म्हणाले की, “कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी माझ्यासह माझ्या २० ते २५ सहकाऱ्यांवर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जो गुन्हा दाखल झालेला आहे तो एक हास्यास्पद गुन्हा आहे”, असं ते म्हणाले. तसेच भुजबळ यांची बेनामी मालमत्ता मी पाहण्यासाठी गेलो होतो आणि म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. तर मी आणि माझा मुलगा नील सोमय्या जेलमध्ये जाणार, असं संजय राऊत म्हणतात पण, मी जेलमध्ये जायला घाबरत नाही, असंही सोमय्यांनी म्हंटलं आहे. याशिवाय राऊतांनी केलेल्या टिप्पणीवर सोमय्या म्हणाले की “एकदाच मला शिव्यांची डिक्शनरी देऊन टाका, उगाच माझ्या आईला सारखा सारखा संताप नको”, असा खोचक टोला लगावत त्यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.

राऊत काय म्हणाले होते? 

खरंतर झालं असं होतं की तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, त्यांच्या या भेटीवरून किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला होता. सोमय्या म्हणाले होते की, ‘उद्धव ठाकरेंनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याआधी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची परवानगी घेतली होती का?, असा खोचक सवाल सोमय्यांनी विचारला होता. तर याबाबत पत्रकारांनी राऊतांना विचारलं असता त्यांनी आक्षेपार्ह शब्दात सोमय्यांना टोला लगावला. “देशाच्या राजकारणात बदल घडत असून 2024 सालानंतर स्वच्छ आणि पारदर्शी सरकार येणार आहे. तेव्हा देशाच्या राजकारणातून सोमय्यासारखे XXX लोक नाहीसे होतील”, अशा शेलक्या शब्दात संजय राऊत यांनी सोमय्यांवर टीका केली होती. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्राचे नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता सध्या कुणामध्ये असेल तर ती शरद पवारांकडे – संजय राऊत 

News Desk

भाजपकडून प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची ऑफर ?

News Desk

संकटाच्या काळात महाराष्ट्राच्या जनतेला खऱ्याअर्थाने तारणारा, सर्वसमावेशक अर्थसंकल्प !

News Desk