HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री, फडणवीसांचा लॉक-अनलॉकच्या गोंधळावरुन टोला

नागपूर | राज्यात कोरोना प्रादुर्भाव काही अंशी काही होताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकार अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं काल (३ जून) मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या घोषणेमुळे वाटलं. राज्यात ५ टप्प्यात अनलॉक होणार असल्याची घोषणा मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. मात्र, त्यानंतर अजूनही हा निर्णय विचाराधीन असल्याचं स्पष्टीकरण आलं होतं. यावरुन सरकारच्या मंत्र्यांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये संवाद आहे की नाही असा प्रश्न पुन्हा एकदा उद्भवला आहे.

राज्यातील या लॉक अनलॉकच्या मुद्द्यावरून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहेत. अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजून घोषणा करतात. केवळ श्रेयवादासाठी या मंत्र्यांनी घोळ घालण्यास सुरुवात केली असून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावावी, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे.

राज्यात एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांनी आज (४ जून) माध्यमांशी संवाद साधत हा टोला लगावला आहे. राज्यात एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहेत. अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजून घोषणा करत आहेत. कोणत्याही सरकारमध्ये पॉलिसी डिसीजन घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. एखाद्यावेळी मुख्यमंत्री अशा घोषणा करण्यासाठी मंत्री नेमतात आणि ते मंत्री सरकारच्या लाईनवर भाष्य करतात. पण या सरकारमध्ये एकाच विषयावर पाच पाच मंत्री घोषणा करत असतात.

विशेष म्हणजे प्रत्येक मंत्री घोषणा करून ही घोषणा मुख्यमंत्री करणार असल्याचं सांगत आहेत. हे सगळं श्रेयासाठी सुरू आहे. हे काही पहिल्यांदाच घडत नाही. अनेकदा असं घडलंय. मंत्र्यांनी पाच पाच वेळा एकाच गोष्टीची घोषणा केल्याचं सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावावी, असं सांगतानाच मेजर पॉलिसी डिसीजनवर सरकारचं म्हणणं स्पष्ट आणि थेट असावं, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.

लोकांमध्ये उत्कंठा, संभ्रम आणि निराशा – फडणवीस

राज्य सरकारने आधी अनलॉक जाहीर केला. नंतर घुमजाव केल्याने मला अनेकांचे फोन आले. लॉकडाऊन आहे की नाही आम्हाला विचारण्यात आलं. मात्र, आम्हाला या निर्णयाची माहिती नसल्याने आम्हाला त्यांना काही सांगता येत नव्हतं. पण मुख्यमंत्र्यांची प्रेसनोट अधिकृत असते. त्यावर विश्वास ठेवा, असं मी सांगितलं. पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊननंतर काल लोकांची उत्सुकता वाढली होती. उत्कंठाही वाढली होती. संभ्रमही निर्माण झाला आणि निराशाही झाली. कालच्या घोषणेमुळे अनेक छोटे दुकानदार सुखावले होते, पण नंतर त्यांचा भ्रमनिरास झाला, असंही ते म्हणाले.

दुकानदारांना जाहीर केलेली वेळ अमान्य

सरकारने काही निर्बंध घातले आहेत. त्यानुसार सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र दुकानदारांना ही वेळ मान्य नाही. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, असं दुकानदारांचं म्हणणं आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकांकडून लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे

swarit

पालघरमध्ये राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर अडवला

News Desk

परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बचा लोकसभेत धमाका, नवनीत राणा,पुनम महाजन, गिरीश बापट आक्रमक

News Desk