HW News Marathi
महाराष्ट्र

८० वर्षांचा योद्धा! शरद पवार…

राज्यातील आणि देशातील राजकीय व्यक्तींच्या यादीतील महत्वाचे नाव म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. आज (१२ डिसेंबर) शरद पवारांचा ८०वा वाढदिवस. त्यांच्या ८० व्या वाढदिवशी राष्ट्रवादी पक्ष अनेक उपक्रम राबवताना दिसत आहेत. शरद पवार यांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते देशाचे कृषीमंत्री असा पल्ला गाठणाऱ्या शरद पवार यांचं राष्ट्रीय राजकारणातील स्थान अढळ आणि महत्त्वाचं आहे. केवळ राजकारणच नाही तर क्रिकेटचं मैदानही पवारांनी गाजवलं आहे. पवार २००५ साली बीसीसीआयचे अध्यक्ष बनले. त्यानंतर २०१० मध्ये ते आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान झाले होते. मुत्सद्दी राजकारणी, अष्टपैलू व्यक्तिमत्व अन् दमदार नेतृत्व म्हणजे शरद पवार. या वयातदेखील पवारांचा झंझावात कायम आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचं मोठं काम शरद पवारांनी केलं आहे. जाणून घेऊयात शरद पवारांच्या काही अनोख्या गोष्टी…

“पवारांची स्मरणशक्ती हा अफलातून गुण”

शरद पवार यांची स्मरणशक्ती अफलातून आहे. याची प्रचिती अनेकदा लोकांना आली आहे. आयु्ष्यात त्यांना एकदा भेटलेली माणसे पुढे दहा वर्षांनी भेटली तरी त्यांच्या लक्षात रहातात. आणि असं घडलेलंही आहे. खेड्या पाड्यात सभेला गेल्यानंतर ते तेथील नेत्यांना, जुन्या जाणत्यांना अगदी नावानिशी हाक मारून त्यांच्याशी आदराने बोलतात. त्यांना मान देतात. समोरची व्यक्ती आपल्याला पवार ओळखतात एवढ्या आनंदातच भारावून जातात.अगदी तालुकास्तरावरच्या नेत्यांची नावेही पवारांच्या डोक्यात असतात. एकदा तर एका सभेला समोरच्या सभाजनांमधील एका शाळूसोबतीला पवारांनी हाक मारून बोलाविल्याचा किस्सा प्रसिद्ध आहे.

माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत आहे. कठीण परिस्थितीतूनही ते मार्ग काढतात. त्यामुळे कुणीच त्यांचा दीर्घकाळ शत्रू रहात नाही. बाळासाहेब ठाकरे हे तर मोठं उदाहरण. राजकारणापलिकडे त्यांची मैत्री आहे. अनेक विरोधी पक्षातील लोक त्यांचे मित्र आहे. माजी उपराष्ट्रपती भैंरोसिह शेखावत यांच्या निवडणूकीवेळी पवारांबद्दल ते त्यांच्या बाजूने मतदान करतील, अशी अफवा होती. कारण शेखावतांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. पण केवळ शेखावतच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवर अनेक नेते पवारांचे चांगले मित्र आहेत. यात सत्ताधारी व विरोधकांचाही समावेश आहे.

इतकचं नव्हे तर, पवारांना वाचनाची आवड आहे. त्यांच्या वैयक्तिक संग्रहात अनेकदा नवीन आलेली पुस्तकं आढळतात. मुंबईत पु. ल. देशपांडे भवन उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. यशंतराव चव्हाण यांच्या स्मृत्यर्थ उभारलेल्या चव्हाण सेंटरतर्फे म्हणूनच अनेक सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रम होतात. कारण त्याची प्रेरणा शरद पवार आहेत. पवारांमुळेच साहित्य क्षेत्रातील अनेक चांगली मंडळी राजकारणात आली. ना. धो. महानोर व रामदास फुटाणे यांची उदाहरणं समोर आहेत.

“शरद पवार एक उत्तम प्रशासक”

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवार हे नाव गाजायला लागले, ते १९७८च्या मध्यापासून. काँग्रेसमध्ये बंड घडवून आणत, जनता पक्षाच्या मदतीने त्यांनी सरकार स्थापले आणि देशातले ते सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. त्यांनी असे करताना, तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला असं राजकीय वर्तृळात वारंवार म्हटलं जातं.

“१२ तारीख शरद पवारांसाठी महत्वाची का आहे?”

राजकारणाच्या आखाड्यात भल्याभल्यांना मात देणारे व महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणातही आपला दबदबा राखणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाचा पाया त्यांच्या आईनेच अर्थात शारदाबाई पवार यांनी रचला होता. हार न मानता, खचून न जाता झुंजण्याचे बाळकडू पवार यांना त्यांच्या आईकडूनच मिळाले. त्याचे स्मरण करत शरद पवार यांनी एक भावनिक पत्र आपल्या दिवंगत आईला नुकतंच लिहिलं होतं.

१२ तारीख शरद पवारांसाठी महत्वाची आहे कारण १२ नोव्हेंबरला त्यांच्या आई शारदाबाई पवार यांचा वाढदिवस असतो.

शरद पवार आपल्याला आईला ‘बाई’ या नावाने हाक मारायचे. त्याच नावाने साद घालत शरद पवार यांनी आपल्या भावनांना पत्राद्वारे वाट मोकळी करून दिली आहे. गेल्या वर्षभरातील दगदग, राजकारणाच्या पिचवर उभे ठाकलेले कडवे आव्हान, साताऱ्यात धोधो पाऊस अंगावर झेलत प्रचारसभेत केलेले भाषण आणि त्यानंतर मिळालेलं यश, गेले काही महिन्यांपासून ओढवलेले कोरोना संसर्गाचे संकट या सर्वांबद्दल शरद पवार यांनी बाईंशी या पत्रातून संवाद साधला आहे. हे पत्र लिहिताना पवार काहीसे हळवे झाल्याचे पाहायला मिळाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांनी राजीनामा द्यायलाच हवा! राज ठाकरेही आक्रमक

News Desk

नागपूरमध्ये नाराज शिवसैनिकांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk

…तर मुलाने मुलासारखे वागले पाहिजे !

News Desk