मुंबई | सतत वाद ओडावून घेणारे भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी रमेश बैस (Ramesh Bais) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात मंत्रिमपद देखील सांभाळले होते. तसेच महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी निुयक्ती होण्याआधी त्यांनी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे.
दरम्यान, भगतसिंग कोश्यारींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल पद सोडण्याची इच्छा व्यक्त करत पत्र लिहिले होते. यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी कोण विराजमान होणार यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या. यात पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बंडखोर नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव समोर आले होते. यानंतर लोकसभेच्या माजी अध्यक्षा आणि भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांचे नाव देखील महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी चर्चेत आले होते. परंतु, अखेर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाली आहे.
रमेश बैस यांचा अल्प परिचय
रमेश बैस यांचा जन्म २ ऑगस्ट १९४७ रोजी छत्तीसगढच्या रायपूरमध्ये झाला होता. रमेश बैस यांनी सर्वप्रथम १९७८ मध्ये नगरपालिकेत निवडून आले होते. १९८० ते ८४ मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. तसेच छत्तीसगढमधील रायपूर येथील लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. रमेश बैस हे मध्य प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष पद देखील सांभाळले असून वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री आणि वन राज्यमंत्री पद देखील भूषविले आहे. २०१९ मध्ये रमेश बैस यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम केले होते. रमेश बैस हे सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत.