HW News Marathi
महाराष्ट्र

सचिन वाझे यांना अटक करून महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला – सामना

मुंबई | अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात ‘एनआयए’ने सचिन वाझे यांना अटक केली. वाझे यांना सध्या एनआयए कोठडी सुनावण्यात आली असली, तरी या प्रकरणावरून शिवसेना-भाजप समोरासमोर आल्याचं दिसत आहे. वाझे यांना अटक झाल्यानंतर भाजपाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली. अंबानी स्फोटकं व हिरेन मृत्यू प्रकरणावरून भाजपकडून होत असलेल्या टीकेला शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे. “सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी उत्तम तपास केला, तरीही केंद्राने सीबीआयला घुसवले. त्या सीबीआयने तरी काय दिवे लावले? हात चोळत बसले,” असं म्हणत शिवसेनेनं आजच्या (१५ मार्च) अग्रलेखातून भाजपवर हल्ला केला आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

महाराष्ट्राच्या पोलीस दलाची क्षमता व शौर्य याची वाहवा जगभरात असताना 20 जिलेटिनच्या कांड्यांसाठी केंद्रीय तपास पथकाने मुंबईत यावे, हे आश्चर्यच आहे. सचिन वाझे यांचे काही चुकलेच असेल व 20 जिलेटिन कांड्यांत ते गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास मुंबई पोलीस, दहशतवादविरोधी पथक सक्षम होतेच, पण केंद्रीय तपास पथकाला ते होऊ द्यायचे नव्हते. त्यांनी वाझे यांना अटक करून महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला आहे. हे सर्व ठरवून घडवले जात आहे. वाझे यांना अटक करून दाखवली, याचा आनंद जे व्यक्त करीत आहेत ते राज्याच्या स्वायत्ततेवर घाला घालीत आहेत. सत्य लवकरच बाहेर येईल, ही अपेक्षा.

मुंबई पोलीस दलातील एक तपास अधिकारी सचिन वाझे यांना एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात एक संशयास्पद स्कॉर्पिओ गाडी आढळली. त्या गाडीत जिलेटिनच्या वीस कांड्या होत्या. त्यामुळे खळबळ माजली. अंबानींचे नाव आल्यामुळे हे सर्व प्रकरण पोलिसांनी फारच मनावर घेतले. हे सर्व का झाले, कसे झाले यावर चर्चा सुरू झाल्या, पण काही दिवसांतच या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत सापडल्याने अंबानी यांच्या घरासमोर न फुटलेल्या जिलेटिन कांड्यांचा ‘स्फोट’ झाला आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी विधानसभेत हे प्रकरण लावून धरले. सरकारने वाझे यांची बदली करून संपूर्ण प्रकरणाचा तपास राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाकडे दिला.

या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच केंद्र सरकारने ‘एनआयए’ला तपासाला पाठवले. त्याची इतक्या तातडीने गरज नव्हती, पण महाराष्ट्रातील एखाद्या प्रकरणात नाक खुपसायला मिळते म्हटल्यावर केंद्रीय तपास यंत्रणा मागे कशा राहतील? वीस जिलेटिन कांड्यांचा व गाडी मालकाच्या संशयास्पद मृत्यूचा तपास एनआयएने हाती घेऊन लगेच वाझे यांना अटक करण्याची कर्तबगारी दाखवून दिली. वाझे यांच्या अटकेने भारतीय जनता पक्षात जे आनंदाचे भरते आले आहे त्याचे वर्णन करण्यास शब्दच अपुरे पडावेत. ‘‘वाझे यांना अटक झाली हो।।’’ असे गर्जत हे लोक रस्त्यावर यायचेच काय ते बाकी आहेत. या आनंदाचे कारण असे की, काही महिन्यांपूर्वी याच वाझे यांनी रायगड पोलिसांच्या मदतीने भाजपवाल्यांचा महंत अर्णब गोस्वामी यास अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी बेड्या ठोकल्या होत्या.

त्या वेळी हे सर्व लोक गोस्वामी याच्या नावाने रडत होते व वाझे यांना शाप देत होते. ‘‘थांबा, बघून घेऊ, केंद्रात आमचीच सत्ता आहे’’, असे सांगत होते. तोोमोका आता साधला असून 20 जिलेटिन कांड्यांच्या प्रकरणात वाझे यांना केंद्रीय पथकाने अटक केली आहे. वाझे यांची अटक कायदेशीर की बेकायदेशीर, या चर्चेला आता अर्थ नाही. विरोधकांची सरकारे अस्थिर किंवा बदनाम करण्यासाठी कोणत्याही थराला जायचे, बनावट प्रकरणे निर्माण करायची, राज्य सरकारच्या अधिकारांवर अतिक्रमण करायचे हे प्रकार सध्या सर्रास चालले आहेत. सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी उत्तम तपास केला, तरीही केंद्राने सीबीआयला घुसवले. त्या सीबीआयने तरी काय दिवे लावले? हात चोळत बसले. कंगना राणावत या बेताल नटीने बेकायदेशीर कृत्ये केली असतानाही केंद्र सरकार व भाजपवाले तिच्या समर्थनासाठी उभे राहिले.

आता 20 जिलेटिन कांड्यांचे प्रकरण राज्याचे दहशतवादविरोधी पथक तपासत असतानाच ‘एनआयए’ने त्यात उडी मारली. अर्णब गोस्वामीस अटक करून त्यास तुरुंगात टाकल्यापासून वाझे हे भाजप आणि केंद्राच्या हिटलिस्टवर होतेच. मुंबई पोलिसांचा तपास पूर्ण होईपर्यंतही केंद्रीय पथकाची थांबायची तयारी नव्हती. 20 जिलेटिनच्या कांड्या सापडण्यासारखे प्रकार देशभरात रोजच घडत आहेत. कश्मीर खोऱ्यांत आजही स्फोटकांचे साठे सापडत आहेत, पण हे एनआयएचे पथक तिकडे गेले काय? पुलवामात स्फोटकांचा साठा नक्की कोणत्या फटीतून आत घुसवला व त्या स्फोटांत आपल्या चाळीस जवानांचे कसे बळी गेले, हे आजही गौडबंगालच आहे! बिहार-नेपाळ सीमेवर हत्यारांची, स्फोटकांची आवक-जावक सुरूच असते. मणिपूर-म्यानमार सीमेवरील स्थिती अशा बाबतीत गंभीरच असते. नक्षलग्रस्त भागात तर बंदुका, स्फोटकांचे कारखानेच निर्माण झाले असून तेथे देशविरोधी कट-कारस्थाने सुरू आहेत, पण तुमचे जे जिलेटिन छाप एनआयए की काय आहे, ते त्या स्फोटकांचा वास घ्यायला गेले नाही. केंद्राला तशी गरजच वाटत नसावी.

महाराष्ट्रात काही खुट्ट झाले की, या केंद्रीय यंत्रणा लगेच महाराष्ट्रात धाव घेतात. अलीकडे हे जणू केंद्र सरकारचे धोरणच झालेले दिसते. अंबानी हे आपल्या देशातील बडे प्रस्थ आहेत. त्यांच्या सुरक्षेत कोणतीही खोट असता कामाच नये. म्हणूनच त्यांच्या घराच्या परिसरात सापडलेल्या 20 जिलेटिनच्या कांड्या व त्यानंतर झालेला मनसुख हिरेनचा मृत्यू हे दोन्ही प्रकार गंभीरच आहेत, पण म्हणून या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांना जमणार नाही हे केंद्र सरकार परस्पर कसे काय ठरवू शकते? मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपींना फासावर लटकविणारे जसे मुंबईचे पोलीस आहेत तसे ‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्यातील कसाबसारख्यांना प्राणाची बाजी लावून पकडणारे व फासावर लटकवणारेही मुंबई-महाराष्ट्राचेच पोलीस दल आहे. महाराष्ट्राच्या पोलीस दलाची क्षमता व शौर्य याची वाहवा जगभरात असताना 20 जिलेटिनच्या कांड्यांसाठी केंद्रीय तपास पथकाने मुंबईत यावे, हे आश्चर्यच आहे.

अर्थात, आता यानिमित्ताने एक स्पष्ट झाले, ‘एनआयए’चे असे येणे हे मागचा हिशेब चुकता करण्यासाठीच होते. वाझे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भंपक गोस्वामीला पकडले, त्याचा टीआरपी घोटाळा उघड केला. त्या बदल्यात केंद्राने वाझे यांना पकडून दाखवले. इथेच ही केस फाईल बंद होते. वाझे यांचे काही चुकलेच असेल व 20 जिलेटिन कांड्यांत ते गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास मुंबई पोलीस, दहशतवादविरोधी पथक सक्षम होतेच, पण केंद्रीय तपास पथकाला ते होऊ द्यायचे नव्हते. त्यांनी वाझे यांना अटक करून महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला आहे. हे सर्व ठरवून घडवले जात आहे. वाझे यांना अटक करून दाखवली, याचा आनंद जे व्यक्त करीत आहेत ते राज्याच्या स्वायत्ततेवर घाला घालीत आहेत. सत्य लवकरच बाहेर येईल, ही अपेक्षा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्रालयासमोर सरकारी कर्मचा-याचा आत्मदहनचा प्रयत्न

News Desk

नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन

News Desk

“कशाला आशीर्वाद?, जनतेचा जीव धोक्यात घालायला” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टीका!

News Desk