HW News Marathi
देश / विदेश

‘महिला कमांडोज आणता ही कसली मर्दानगी?’- संजय राऊत

नवी दिल्ली | राज्यसभेत काल(११ ऑगस्ट) झालेल्या गोंधळावरून विरोधी पक्ष आता चांगलाच भडकलेला आहे. राज्यसभेत सुरू असलेला गोंधळ रोखण्यासाठी काल राज्यसभेत महिला कमांडोज बोलावण्यात आल्या होत्या. शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खासदारांना आवर घालण्यासाठी महिला कमांडोजना पाचारण करता ही कसली मर्दानगी आहे?, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

भारात-पाकिस्तानच्या सीमेवरही असं सैन्य नसेल

राज्यसभेच्या गोंधळामुळे विरोधी खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. “मार्शल बोलावणं ही काही नवी गोष्ट नाही. विधानसभेत आणि लोकसभेतही कमांडोज बोलावले जातात. पण जणू काही एखादी दंगल घडते आणि दंगल अटोक्यात येत नाही, तेव्हा सैन्याला बोलावलं जातं तसं बंदुका घेऊन सैन्य बोलावलं गेलं. भारात-पाकिस्तानच्या सीमेवरही असं सैन्य नसेल. तिथे सरळसरळ घुसखोरी होते. चीनचे लोकं घुसत आहेत. तिथे अशाप्रकारे व्यवस्था नाही आणि संसदेत खासदारांसमोर महिला कमांडोज होत्या. तो नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग तो अशा महिला कमांडोज घेऊन फिरतो. काल संसदेतही आम्ही पुढे जाऊ नये म्हणून हे कमांडोज आणले. महिलांना आमच्यासमोर उभे करता ही कोणती मर्दानगी आहे”, असा हल्ला राऊत यांनी चढवला.

नेमकं काय घडलं?

राज्यसभेत रुल बुक फेकले असेल तर याचा अर्थ सरकारने नियमांचं पालन केलं नाही. रुल बुक वाचा आणि संसदेचं कामकाज चालवा यासाठी प्रताप बाजवा यांनी रुल बुक फेकलं असं म्हणणं आहे. कारण नियमानुसार काम चालत नव्हतं. काल पाच साडेपाच वाजता घटना दुरुस्ती बिलावर उत्तम प्रकारे आणि शांतपणे चर्चा सुरू होती. सहमतीने चर्चा सुरू होती. बहुमताने बिल मंजूर करून घेतलं. संपूर्ण विरोधी पक्षाने सहकार्य केलं. पण जे इन्श्युरन्स संदर्भातील बिल आहे. विमा कंपन्यांचं खासगीकरण करण्याचं त्याला विरोध आहे. देशभरातून विरोध आहे. ते आज न आणता उद्या आणावं असं काल सकाळी ठरलं होतं. या बिलावर उद्या चर्चा करण्यावर सहमतीही झाली. जेव्हा एसईबीसी बिल मंजूर झालं. तेव्हा लगेच या बिलावर कारवाईला सुरुवात झाली. त्यावर सर्व विरोधक उठले. शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगेही उठले. त्यांनी विरोध केला. पण सभागृह नेते पीयूष गोयल आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी हे बिल रेटण्याचा ज्या पद्धतीने प्रयत्न केला त्यातून भडका उडाला. सरकारने ठिणगी टाकण्याचं काम केलं, असा दावा त्यांनी केला आहे.

त्यामुळे देसाई वेलमध्ये उतरले

राज्यसभेत सहसा कोणी वेलमध्ये जात नाही. पण आमचे अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी काल वेलमध्ये गेले. का गेले? कारण अनिल देसाई हे विमा कंपन्याचे कर्मचारी वर्गाचे नेते आहेत. विमा कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे देसाई वेलमध्ये उतरले. हे बिल थांबवा सांगण्यासाठी. पण तुम्ही धक्काबुक्की करता? महिला कमांडोज आणता समोर. लाज वाटली पाहिजे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.

शरद पवार संतप्त

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. 55 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी कोणत्याही सभागृहात असं चित्रं पाहिलं नाही. हे पवारांसारख्या नेत्याला अस्वस्थतेतून बोलावं लागलं. माझ्याशी बोलले ते. मीडियाशी बोलले. ते फार अस्वस्थ होते. ज्यांनी संपूर्ण हयात संसदीय राजकारणात घालवली आहे ते सर्व नेते अस्वस्थ होते, असंही त्यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Union Budget 2021 |  मिशन पोषण 2.0 ची अर्थमंत्र्यांकडून घोषणा

News Desk

जुलैपासून मोबाईल नंबर होणार 13 अंकी

Adil

डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांची स्वेच्छानिवृत्ती, बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता !

News Desk