HW News Marathi
महाराष्ट्र

CBI, ED काहीही असू द्या, काहीही झालं तरी सरकार, आमदार, नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत – संजय राऊत  

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीच्या पथकाने आज छापा टाकला आहे. महाविकास आघाडी सरकारला हा मोठा धक्का आहे. दरम्यान, यावर राजकीय वर्तृळातील अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही, काय अटक करायची ती करा, नोटीसा कसल्या पाठवता, घरी या,” असे आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला दिलं आहे. “तुम्ही कितीही काहीही केलं तरीही या महाराष्ट्रात विजय सत्याचा होईल,” असेही राऊतांनी यावेळी खडसावून सांगितले. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

“केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन हे सरकार दबावाखाली येईल, असे कोणाला वाटत असेल, तर ते मूर्खाच्या अंदमानात फिरत आहे. सीबीआय ईडी काहीही असू द्या, काहीही झालं तरी सरकार, आमदार, नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू, हे सरकार पुढील चार वर्ष नाही, तर त्यापुढे जाऊन हे सरकार कायम राहील,” असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

“काही यंत्रणांचा वापर करुन जे सरकारवर दबाव आणू इच्छितात किंवा आमदारांचे मनोबल तोडू इच्छिता त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे हा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, दहशत निर्माण करा. तुम्ही पुढची २५ वर्षे तुमचं सरकार येईल, हे स्वप्न विसरुन जा, ही आता काळ्या दगडावरची रेघ समजा,” असेही संजय राऊतांनी सांगितले आहे.

“आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. आमच्या प्रत्येक आमदार, नेते, कार्यकर्त्याच्या घरासमोर ईडीने कार्यालय थाटलं, तरी आम्ही घाबरत नाही,” असेही राऊत म्हणाले आहेत.

“ईडी किंवा अन्य कोणीही राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणे काम करु नये. ज्यांचे आदेश ते पाळत आहेत, त्या पक्षातील १०० लोकांची यादी मी पाठवून देतो. त्यांचे काय धंदे आहेत, ते काय उद्योग करतात, त्यांचं मनी लॉन्ड्रिंग कसं सुरु आहे, निवडणुकीत कसा पैसा येतो, कुठे ठेवला जातो, कसा वाटला जातो, बेनामी काय आणि नामी काय, ही कल्पना ईडीला नसली तरी आम्हाला आहे,” असेही राऊत म्हणाले आहेत.

“गेल्या काही दिवसांपासून ईडी, सीबीआय या यंत्रणा गुलाम, चाकर आणि नोकर असल्यासारखे वागत असतील तरी आम्ही पर्वा करत नाही. आज प्रताप सरनाईक त्यांच्या घरी नाही आहेत. त्यांची मुले घरी आहेत. हे पाहून त्यांनी जी धाड टाकली ही नामर्दांगी आहे. भाजपने सरळ लढाई करावी. हे शिखंडीसारखे यंत्रणांच्या आडून कारवाई करू नका.”

“ED काय इंटरपोलला आणा, आम्ही घाबरत नाही. तपास करण्याची बंदी नाही. त्यातून पुरावे मिळाले तर कारवाई करू शकतात. पण तुम्हाला विरोधकाना गप्प करण्यासाठी जी नीती अवलंबतात ती तुमच्यावरही उलटू शकते. साम दाम दंड भेद यात आम्हीही डॉक्टरेट केली आहे. आमचा जन्म साम दाम दंड भेदातून झाला हे विसरू नका,” असेही राऊतांनी यावेळी भाजपला खडसावले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यशवंतराव  चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 कोटी रुपयांची मदत

News Desk

पाण्याच्या वाढत्या मागणीनुसार मुळशी टप्पा क्रमांक दोनच्या प्रस्तावास लवकरच मंजुरी! – अजित पवार

News Desk

गावात जास्त घोळक्याने लोक आले तर गावकऱ्यांनी पोलिसांकडे माहिती द्यावी

swarit