HW News Marathi
देश / विदेश

‘केंद्राने खाऊचा डबा दिला, पण डबा रिकामाच आहे’, संजय राऊतांचा केंद्राला खोचक टोला

नवी दिल्ली | संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काल(९ ऑगस्ट) मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडण्यात आला होता. तर आज(१० ऑगस्ट) १०२व्या घटना दुरुस्ती विधेयकावर चर्चा होणार आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी खोचक टीका केली आहे. केंद्राने आम्हाला एक खाऊचा डबा दिला आहे. पण हा डबा रिकामाच आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. मात्र, घटना दुरुस्ती विधेयकाला शिवसेना पाठिंबा देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार नाही

संजय राऊत यांनी आरक्षणावर आपलं मत स्पष्ट केलं आहे. “आरक्षणासाठी विधानसभेने ठराव संमत करून कायदाही केला. पण राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार नाही, असं सांगून कोर्टाने विधानसभेचा कायदा रद्द केला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधानांना भेटले.घटनादुरुस्ती करून राज्यांना अधिकार द्यावे लागेल, अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली. पंतप्रधानांनीही ही मागणी मान्य केली. त्यामुळे घटना दुरुस्ती विधेयक आज संसदेत येत आहे. हे जरी असलं तरी एक पेच कायम आहे. राज्यांना आरक्षणाचा अधिकार दिला तरी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्याने वाढवता येणार नाही. त्यामुळे राज्यांना अधिकार मिळूनही राज्य आरक्षण देऊ शकेल की नाही याची शंका आहे. तरीही केंद्र सरकारने जे पाऊल टाकलं त्याकडे आम्ही सकारात्मक दृष्टीने पाहतो. त्यावर लोकसभेत चर्चा होईल. उद्या राज्यसभेत येईल. आम्ही पूर्णपणे या जनतेच्या हिताच्या बिलाला पाठिंबा देत आहोत”, असं राऊत म्हणाले आहेत.

मानपानाचा विषय नसून एका मोठ्या समाजाला मदत करण्याचा हा विषय

आरक्षणाबाबतची अपवादात्मक परिस्थिती आहेच. त्याबाबत काय करायचं हे राज्य ठरवेल. त्यात कोणताही कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेऊ. केंद्रानेही घ्यावी. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. त्यांना कायद्याचे पेच जास्त माहीत आहेत. आम्ही त्यांच्या मतांचा आदर करतो. काही वकिली सल्ला लागला तर सरकार नक्कीच त्यांचा सल्ला घेईल. हा काही राजकीय मानपानाचा विषय नसून एका मोठ्या समाजाला मदत करण्याचा हा विषय आहे, असं ते म्हणाले आहेत.

आमची तटबंदी काय आहे याची कल्पना त्यांना आहे

राज्यातील भाजपचे नेते दिल्लीत आहेत. काल(१० ऑगस्ट) या भाजप नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी महाविकास आघाडी विरोधात मोर्चेबांधणी करण्याचा निर्णय झाला. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मोर्चेबांधणी हे शब्द बोलायला सोपे आहेत. आमची मोर्चेबांधणी आणि आमची तटबंदी काय आहे याची कल्पना त्यांना आहे, असा टोला त्यांनी लगावला. जनता २०२४ च्या निवडणुकीची वाट पाहत आहे. त्यावेळी जनता कुणाला आशीर्वाद देणार ते दिसेलच, असंही ते म्हणाले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन, मुंबईतील पावसावर झाली चर्चा

News Desk

इस्रोकडून तीन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीभोवतीच्या कक्षेत केले स्थापित

Aprna

‘या’ कारणामुळे बॅंका ५ दिवस बंद राहणार

News Desk