HW News Marathi
महाराष्ट्र

“चंद्रकांत पाटलांनी काल केक जास्त खाल्ला असेल…”,वाघाच्या वक्तव्यावर राऊतांचा पलटवार

नंदूरबार | शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वाघाच्या वक्तव्यावरील शाब्दिक चकमकी अजूनही सुरूच आहेत. आजही (११ जून) संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका केली. आमची मैत्री जंगलातल्या वाघाशी होती पिंजऱ्यातल्या नाही असं चंद्रकांत पाटील यांनी काल म्हटलं होतं. त्याला पुन्हा एकदासंजय राऊतांनी पलटवार केला आहे. संजय राऊत म्हणाले की, काल चंद्रकांत दादांचा वाढदिवस होता त्यामुळे केक जास्त खाल्ला असेल, असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली.

संजय राऊत आज नंदूरबारमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. चंद्रकांत पाटलांचा काल वाढदिवस होता. त्यांनी जास्त केक खाल्ला असेल. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेऊ नका, असं सांगतानाच शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, असं चंद्रकांतदादा म्हणत आहे. त्यांना तसं वाटत असेल तर पिंजऱ्यात आम्ही बसलो आहोत दरवाजा उघडा आहे हिंमत असेल तर आत येऊन दाखला असं राऊत म्हणाले. पुढे ते असंही म्हणाले की, पिंजऱ्यातल्या वाघालाही मिश्या असतात, हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा, असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.

पवार-प्रशांत किशोर भेटीकडे लक्ष देण्याची गरज नाही

यावेळी त्यांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. एखादा सर्व्हे करण्यासाठी किंवा एखाद्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ते पवारांना भेटले असतील. त्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असं ते म्हणाले.

आरक्षणाचा निर्णय केंद्रालाच घ्यावा लागेल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. शिष्टाचाराचा भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत पंतप्रधानांना भेटायला गेले होते. या भेटीत महाराष्ट्रातील समस्यांवर चर्चा झाली. त्यामुळे या भेटीवर राजकारण करण्याची गरज नाही, असं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाबाबत आता राज्याची भूमिका राहिलीच नाही. आता केंद्रालाच भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे, असं ते म्हणाले.

काँग्रेसला सल्ला

काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून जाण्याच्या मार्गावर आहेत. काँग्रसने आता सामान्य जनतेत पक्ष संघटन मजबूत करावे, असं मी म्हटलं होतं. शेवटी विरोधी पक्ष हा मजबूत आणि सक्षम असावा लागतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.

…तर सामनात माझ्यावर आठवड्याला एक अग्रलेख नसता!

पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आणि संजय राऊत यांना देखील टोला लगावला आहे. “आज माझा वाढदिवस आहे. त्यामुळे कटू बोलायला नको. संजय राऊतांनी मला मनाविरुद्ध का होईना गोड म्हटलंय आणि शुभेच्छा दिल्या आहेत. मनामध्ये जर मी गोड असतो, तर साधारणपणे सामनाचा आठवड्याला एक अग्रलेख माझ्यावर लिहिला गेला नसता. मला काल एका कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने एक वाघ भेट म्हणून दिला. मी म्हटलं चांगलंय, आमची वाघांशी दोस्ती आहे. तर त्यावर पत्रकारांनी शिवसेनेचा मुद्दा काढला. मी म्हटलं आम्ही दोस्ती करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. पण आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोपर्यंत आमची दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला वाघ झालाय”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

वाघ ठरवेल मैत्री कुणाशी करायची… – संजय राऊत

दरम्यान, संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना शुभेच्छा वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी, चंद्रकांत पाटलांच्या कालच्या वाघासंदर्भातल्या विधानावरून त्यांनी टोला देखील लगावला होता. “चंद्रकांत पाटील हे गोड आहेत. त्यांना अशाच प्रकारे कार्यकर्त्यांच्या भेटी घेत राहाव्यात. वाघ ठरवेल की मैत्री कुणाशी करायची”, असं संजय राऊत म्हणाले होते.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

वाघाशी दोस्ती करावी यासाठी मला वाघ भेट दिला, पण वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती. उद्धवजीं जुनी मैत्री मोदीजींशी आहे असं सांगितलं. त्यांचं म्हणणं फडणवीस-पाटलांशी जमत नाही. इकडे दोस्ती असती तर 18 महिन्यापूर्वीच सरकार आलं असतं. मोदींनी जर सांगितलं, त्यांची इच्छा असेल तर त्यांची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा. मोदींजींनी आदेश दिल्यावर काय वाटेल ते करु. जरी भाजप-शिवसेनेचं सरकार आलं, असं मी म्हणत नाही, पण तुम्ही ज्या चर्चा करताय, त्यानुसार जरी सरकार आलं तरी निवडणुका वेगळ्याच होणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वर्धा येथील लष्करी तळावर भीषण स्फोट, ६ जणांचा मृत्यू

News Desk

मनसेचे वाहतूक अध्यक्ष यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे पत्रातून केल्या ‘या’ मागण्या

News Desk

नारायण राणे राज्यसभेवर तर मुले आमदार?

News Desk