HW News Marathi
महाराष्ट्र

‘राजू शेट्टींबाबत राज्यपाल निर्णय घेतील’, शरद पवारांचं वक्तव्य!

पुणे | विधान परिषदेवरील राज्यपालांच्या १२ आमदारांच्या यादीत राजू शेट्टींचं नाव नसल्यामुळे आता राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे. त्याबाबत राजू शेट्टी यांनीही आक्रमक भूमिका मांडली आहे. या बाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपालांना देण्यात आलेल्या यादीत राजू शेट्टी यांचं नाव आहे. आता राज्यपालांनी त्यावर अंतिम निर्णय घ्यायचा आहे, असं शरद पवार म्हणाले. ते आज पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी शेट्टींबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

“ते नाराज असतील त्याबाबत मला काही म्हणायचं नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी यादी माननीय राज्यपालांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्यावतीनं दिलेली आहे. त्यात राजू शेट्टी यांनी सहकार आणि शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिलं आहे ते लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर घ्यावं, असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही. एकदा आम्ही निर्णय घेतल्यानंतर याबाबतची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना मला आश्चर्य वाटतं की अशाप्रकारची विधान कशी केली जातात. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणाने केलं आहे. राजू शेट्टींनी काय वक्तव्य केलं मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही. मी दिलेला शब्द पाळला आहे. आता राज्यपाल काय करतात याची आम्ही वाट पाहतोय’, असं शरद पवार म्हणाले आहेत.

राजू शेट्टी काय म्हणाले?

आमदारकी द्यावी की देऊ नये हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे. तो साधा समझोता आहे. राजकारणात असे समझोते होत असतात. 2019 च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षात हा समझोता झाला होता. तो पाळायचा की नाही पाळायचा की पाठीत खंजीर खुपसायचा आणि कशा पद्धतीने पाळायचा हे ज्यांनी शब्द दिला त्याने ठरवायचं आहे. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो, असं शेट्टी म्हणाले आहेत.

तर करेक्ट कार्यक्रम करेन

मला त्या यादीतून का वगळण्यात आलं हे राष्ट्रवादीचे नेते सांगू शकतील. डावललं की नाही हे मलाही माहीत नाही, असं सांगतानाच ‘करेक्ट कार्यक्रमा’च्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन, असा इशाराही त्यांनी दिला. मी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे म्हणून मला डावलले गेले आहे. मी हाडाचा कार्यकर्ता आहे. मला आमदारकी काही मिळो न मिळो माझे आंदोलन सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सदाभाऊ खोतांचा शेट्टींना टोला

“त्यांचा आमदारकीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे. मला वाटतं की त्यांचा भ्रमनिराश तेव्हा लगेच झालेला होता, कारण सदाभाऊ खोत मंत्री असल्यामुळं. मग आता भ्रमनिराश झाला की नाही? झाला असला तर आता त्यांनी आत्मक्लेष यात्रा दुसऱ्यांदा काशीपर्यंत काढावी, जेणेकरून मी यांच्याकडे जाऊन माझी काशी झाली म्हणून मी आता काशीला अंघोळ करायला आलोय”, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना टोला लगावलाय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही”, फडणवीसांचा राऊतांना टोमणा

News Desk

कॉँग्रेस-राष्ट्रवादीत मतभेद

News Desk

राज्यात जीवनावश्यक वस्तूसह औषधांची कोणतीही टंचाई नाही, राज्य सरकारचे जनतेला आश्वस्त करणारे पत्रक

News Desk