Site icon HW News Marathi

केंद्र शासनाच्या सागर परिक्रमा अभियानाला महाराष्ट्राचे सर्वतोपरी सहकार्य; सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय मंत्र्यांना ग्वाही

नवी दिल्ली । महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किलोमीटर सागरी किनाऱ्याची परिक्रमा करून येथील मच्छिमारांशी थेट संपर्क करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्राच्या सागर परिक्रमा अभियानात महाराष्ट्र सर्वतोपरी सहकार्य करेल आणि सहभागी होईल, अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय  मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांना सोमवारी (१७ जानेवारी) येथे दिली.

 

केंद्रीय मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांच्या अध्यक्षतेखाली सागर परिक्रमा टप्पा 3 च्या आढावा बैठकीचे आयोजन गरवी गुजरात भवन येथे करण्यात आले. या बैठकीस केंद्रीय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री संजीव बालियान, राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार विनायक राऊत, आमदार सुनील राणे, मासेमारी संघटनेचे अध्यक्ष तुकाराम वानखेडे, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव तथा मत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ. अतुल पाटणे यांच्यासह केंद्र शासनातील मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

भारताला एकूण ८ हजार किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. यंदाचे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष असून या वर्षात सागरी भागातील मासेमारीशी निगडित समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने सागर परिक्रमा हा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत सागरी मार्गातून परिक्रमा करून प्रत्यक्ष मासेमारी करणाऱ्यांना भेडसावणारे प्रश्नांना समजून घेण्याचा प्रयत्न असल्याचे केंद्रीय मंत्री रूपाला यांनी यावेळी सांगितले. यातंर्गत गुजरात राज्याची परिक्रमा पूर्ण झालेली आहे. पुढचा तिसरा आणि चौथा टप्पा महाराष्ट्राचा आहे. सागरी परिक्रमेच्या माध्यमातून मासेमारी करणाऱ्यांना केंद्र शासनाच्या योजनेचा अधिकाधिक लाभ मिळावा, असा प्रयत्न असल्याचेही  रूपाला म्हणाले.

 

सागर परिक्रमा या उपक्रमाचे कौतुक करीत  मुनगंटीवार म्हणाले, केंद्र शासनाकडे  मत्स्यव्यवसायाशी संबंधित अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती राज्यांनाही देण्यात यावी तसेच अशा तंत्रज्ञानाचे उपकेंद्र राज्यात स्थापित करावे. यासह पांरपारिक मासेमारांसाठी आणि तंत्रज्ञानाच्या सहायाने मासेमारी करणाऱ्यांसाठी देशभर समान नियमावली असावी. सध्या यात तफावत दिसत असल्याचे त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निर्दशानास आणून दिले.

 

ज्या राज्यांमध्ये मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते, अशा राज्यांच्या दोन दिवसीय परिषेदेचे आयोजन केंद्राने करावे, अशी विनंती, मुनगंटीवार यांनी यावेळी केली. महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना लागून सागरी किनारा आहे. पंरतु राज्यात अंतरदेशीय मासेमारीही मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच मासेमारी विक्रीच्या कामात हजारो लोक गुंतले आहेत. माश्यांची साठवणूक, विक्री संदर्भातील तसेच अन्य अडचणी आहेत. सार्वजनिक खाजगी भागीदारीतून मॉडेल तयार करून याचा लाभ मासेमारी व्यवसायातील लोकांना वर्षभर होईल, अशी योजना केंद्रीय स्तरावर असावी, अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.

 

यासह किसान क्रेडीट कार्ड, मासेमारांसाठी पायाभूत विकास, जुन्या जेट्टींचे निराकरण, अशा महत्वपूर्ण विषयांवर सोमवारच्या बैठकीत चर्चा झाली. केंद्रीय मंत्री  रूपाला यांचा महाराष्ट्रातील सागर परिक्रमा अंतर्गत टप्पा-3 आणि 4 मध्ये अधिकाधिक मासेमारांशी थेट  संपर्क होईल, असे नियोजन केले जाईल, असे  मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version