HW News Marathi
महाराष्ट्र

“विरोधी पक्षाचे नेते कोणत्या नशेत बोलतात, याचा तपास एनसीबीने करावा”, शिवसेनेची टीका

मुंबई। नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर चांगलीच टीका केलेली संपूर्ण राज्याने पाहिली यानंतर मात्र विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनी गरळ ओकल्याची सणसणीत टीका केली. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर भलतीच टीका केली होती. एकंदरीतच चौफेर भाजपकडून शिवसेनेचा दसरा मेळावा तील भाषणावर टीका झाली. मात्र आज तीच दुखरी नस पकडत संतापलेल्या संजय राऊतांनी आजच्या सामना अग्रलेखामधून ‘कमी प्रतीचा गांजा’ या मथळ्याखाली अग्रलेख लिहून भाजप नेत्यांवर हल्लाबोल केलाय. विरोधी पक्षाचे नेते कोणत्या नशेत बोलतात, याचा तपास एनसीबीने करावा, अशी हास्यास्पद टीका आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनामधून केली.

फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील कोण?

पक्षप्रमुखांचे भाषण परंपरेप्रमाणे गाजले आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री अशा दोन वेगळ्या भूमिकेत आहेत, पण दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो व शिवसेना पक्षप्रमुख मेळाव्यात आपले विचार मांडत असतात. भाजपने ठाकरे यांच्या जोरदार भाषणावर बेंबीच्या देठापासून बोंबा मारायला सुरुवात केली आहे. फडणवीस यांनी तर ”उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच कसे?” अशी ‘अलोकशाही’ भूमिका घेऊन मनातली खदखद बाहेर काढली. उद्धव ठाकरे यांनी एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करु असे सांगितले होते, पण ते स्वतःच झाले, असा आक्षेप घेणारे फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील कोण? असा सवाल देखिल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.

चिलमीत जास्तीचा गांजा भरून ‘दम मारो दम’ करावे लागले

केंद्रातले सरकार कोणत्याही प्रश्नांना सामोरे जात नाहीत. प्रश्न विचारणाऱ्यांना ते खतम करतात. लोकशाही, घटना, कायदा त्यांना मान्य नाही. विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री ते स्वीकारत नाहीत. राजकारणाचा हा नवा ‘पदर’ बरेच काही सांगून जातो. कमी प्रतीचा गांजा मारल्यानेच या कल्पना त्यांना सुचत असाव्यात. दसरा मेळावा, त्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण वाया गेले नाही. ठाकरे यांच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरून ‘दम मारो दम’ करावे लागले. त्यांच्या चिलमीतला गांजा कमी प्रतीचा होता हे त्यांच्या चुकीच्या बडबडण्यावरून स्पष्ट होते.

लोक गांभीर्याने घेत नाहीत

महाराष्ट्राची सत्ता गमावून दोन वर्षे झाली. त्या धक्क्यातून त्यांनी सावरायला हवे. जे घडले आहे ते स्वीकारुन पुढे जायला हवे. राजकारणात हे असे चढ-उतार येतच असतात. सत्य स्वीकारले नाही तर निराशेचे आणि वैफल्याचे झटके येतात व लोक अमली पदार्थांच्या आहारी जातात. भाजपचे लोक दसरा मेळाव्यानंतर ज्या बेधुंद पद्धतीने शिमगा करीत आहेत, बेताल आरोप करीत आहेत ते बरे नाही. हे लोक नशेत वगैरे बोलत आहेत काय त्याचा तपास व्हावा. अस देखील संजय राउत म्हणाले. 2024 नंतर देशाच्या राजकारणात बदल होतील तेव्हा ईडी, सीबीआय, एनसीबी त्यांचे ऐकणार नाहीत व त्यावेळी तोंडून फालतूची गांजाफेक केली तर भलत्याच प्रसंगाला सामोरे जावे लागेल. नशेच्या अमलाखाली केलेले वक्तव्य आणि कृत्य लोक गांभीर्याने घेत नाहीत.

डोक्यात कमी प्रतीचा गांजा असल्याचे दाखवून दिले

आताही भाजप पुढाऱ्यांच्या तोंडून जी भन्नाट मुक्ताफळे व शिमगोत्सव सुरू आहे, त्यामागे लोकमान्यांनी जे ‘गांजापुराण’ सांगितले ते आहे काय? एनसीबीने या सगळ्याचा तपास करायला हवा. वाटल्यास भानुशाली, गोसावी, फ्लेचर या ‘भाजपाई’ कार्यकर्त्यांना घेऊन धाडी घालाव्यात, हवे तसे पंचनामे करावेत, पण दसरा मेळाव्यानंतर भाजप नेते कोणत्या नशेत बोलत आहेत ते पाहावेच लागेल.शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, भाजपला सत्तेचा माज आला आहे. पवार यांनी वैयक्तिक टीका केली नाही. शेतकऱ्यांना ज्या प्रकारे चिरडले गेले त्यावरचा हा संताप आहे, पण भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी पवार यांचा उल्लेख ‘एकेरी’ भाषेत करून आपल्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा असल्याचे दाखवून दिले.महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने जनतेचा विश्वास आणि प्रतिष्ठा गमावली आहे. ‘विश्वास गमावला’ असे खरे तर एखाद्या सरकारविषयी बोलण्याची पद्धत आहे, पण महाराष्ट्रात गंगा उलटी वाहताना दिसत आहे. येथे विरोधी पक्षाचे रोजच हसे होत आहे. विरोधी पक्ष हा चेष्टेचा विषय बनला आहे व लोकशाहीसाठी हे चांगले लक्षण नाही. केंद्रातील भाजप धुरिणांना ‘विरोधी पक्ष’, ‘विरोधी सूर’ या संसदीय लोकशाहीच्या संकल्पनाच मान्य नाहीत. असे आसूड खासदार संजय राऊत यांनी ओढले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘मकर संक्रांती’च्या शुभेच्छा

Aprna

#Coronavirus : ‘मी घरी थांबणार, मी कोरोनाला हरवणार’, आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

swarit

संतापजनक! गर्भवती वनरक्षक महिला आणि पतीला माजी सरपंचाकडून मारहाण

Aprna