Site icon HW News Marathi

छत्रपती संभाजीनगरमध्ये वुमन-२० प्रारंभिक बैठकीला सुरुवात

मुंबई। वुमेन -20 (W-20) इंडियाच्या प्रारंभिक बैठकीचे सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत किशनराव कराड, केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील आणि जी -20 इंडियाचे शेर्पा अमिताभ कांत यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. W20 इंडियाच्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा ,W20 च्या संस्थापक अध्यक्ष डॉ. गुलदेन तुर्कतान आणि W-20 इंडियाच्या मुख्य समन्वयक धरित्री पटनायक देखील यावेळी उपस्थित होत्या. W-20 च्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा यांनी “वेदांची भूमी” मध्ये प्रतिनिधींचे स्वागत केले आणि समता, समानता आणि प्रतिष्ठा असलेले जग प्रस्थापित करण्याच्या भारताच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला.

W20 इंडियाने नॅनो, मायक्रो आणि स्टार्टअप उद्योगांमध्ये महिलांचे सक्षमीकरण यावर पहिले सत्र आयोजित केले. W20 इंडियाच्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा यांनी या सत्राचा प्रारंभ करताना महिलांना त्यांचे स्वतःचे उद्योग उभारण्यात आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यात मदत करणारा iWN365 उपक्रम सुरू केला.

GCMMF इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी सर्वच क्षेत्रातील महिलांनी अमूलला भारतीय दुग्ध उद्योगाचा कायापालट करण्यात कशी मदत केली याचा पुनरुच्चार केला. त्यानंतर पॅनेल चर्चेत अमेरिकेतील व्हर्जिनिया लिटलजॉन दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या तर भारतातून जहनाबाई फुकन, तुर्कीच्या सेविम झेहरा काया, भारताच्या नताशा मजुमदार आणि जपानच्या सातोको कोनो उपस्थित होत्या. या सत्रात महिलांना कोणताही भेदभाव आणि पूर्वग्रह न ठेवता त्यांचा स्वतःचा उद्योग उभारण्याची मुभा देणारी चौकट आखण्यावर भर देण्यात आला.

‘हवामानानुसार कृतीत बदल घडवणाऱ्या महिलांची भूमिका’ या विषयावरील दुसऱ्या सत्रात जागतिक स्तरावर धोरण आखताना लिंगभेद करू नये हे अधोरेखित करण्यात आले. हवामान बदल संबंधी W-20 कृतीदलाच्या अध्यक्ष मार्टिना रोगाटो यांनी “हवामान बदल हा आता सिद्धांत राहिलेला नाही. दुर्दैवाने आता हे एक वास्तव आहे ” यावर भर दिला.

या चर्चा सत्राच्या तज्ञ मंडळामध्ये, जीसीईएफच्या संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष एंजेला जू-ह्यून कांग, आशियाई विकास बँकेत लैंगिक समानता थीमॅटिक ग्रुपच्या प्रमुख सामंथा जेन हंग; छत्रपती संभाजीनगर येथील सेंटर फॉर अप्लाइड रिसर्च अँड पीपल्स एंगेजमेंट या संस्थेच्या सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक नताशा जरीन; एसआयबीयूआर च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सल्लागार एलेना म्याकोटनिकोवा तसेच युवा हवामान बदल प्रवर्तक आणि क्लायमेट लीडरशिप कोलिशन सल्लागार प्राची शेवगावकर यांचा समावेश होता.

डब्ल्यू 20 इनसेप्शन मीटच्या तिसर्‍या सत्रात, राजकीय आणि सार्वजनिक नेतृत्वात तळागाळातील मुली आणि महिलांचा समान सहभाग सुनिश्चित करण्यातील आव्हाने आणि मार्ग ओळखण्यासाठी ‘तळागाळातील महिला नेत्यांसाठी सक्षम पारिस्थितिक प्रणाली तयार करणे’ यावर लक्ष केंद्रित केले गेले. डब्ल्यू 20 कृती दलाच्या सह-अध्यक्ष डॉ. फराहदिभा टेनरिलेम्बा यांनी तळागाळातील नेतृत्व या सत्राचे संचालन केले. चर्चा सत्राच्या तज्ञ मंडळामध्ये पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्य प्रा. शमिका रवी, माजी भारतीय पोलीस सेवा अधिकारी आणि भारतातील तळागाळातील राजकीय नेत्या भारती घोष, वलसाड जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडच्या उपाध्यक्ष सुधाबेन सुरेशभाई पटेल, हार्वर्ड केनेडी स्कूलच्या महिला नेटवर्कच्या सह-अध्यक्ष फराह अरबे; सीमा ग्रामीण समितीच्या लिंग विशेषज्ञ सिबुले पोसवेओ, तळागाळातील संशोधक तसेच सेपियन्स संशोधन आणि विश्लेषण संस्थेच्या संस्थापक आणि संचालक आणि ग्राम्य या संस्थेच्या संस्थापक आणि संचालक रिमझिम गौर यांचा समावेश होता.

चौथ्या सत्रात ‘इम्प्रूव्हिंग ऍक्सेस थ्रू इन्फ्रास्ट्रक्चर अँड स्किल टू ब्रिज द जेंडर डिजिटल डिव्हाईड’ या विषयावरील चर्चेत लिंग आधारित डिजिटल भेदभाव दूर करणे, तंत्रज्ञान आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज यांचा फायदा घेऊन महिलांना अडथळे दूर करण्यासाठी सक्षम बनविणे आणि स्वत:ला मानवी समाजाचा मुख्य रचनाकार म्हणून स्थापित करण्याला प्रोत्साहन देणे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. जी -20 इंडियाच्या विकासशील कार्य गटाचे सह-अध्यक्ष, नागराज नायडू यांनी या सत्रातील आपल्या प्रास्ताविकात, डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये भारताच्या द्विगुणित परिवर्तनावर पुन्हा एकदा भर दिला. या पायाभूत सुविधांमुळे नागरिकांना सार्वजनिक हितासाठी वापरता येणाऱ्या क्षमतांची जाणीव होऊ शकते असे ते म्हणाले. या चर्चासत्रात युनेस्कोच्या गॅब्रिएला रामोस, जर्मनीच्या ज्युलियन रोसिन, इटलीच्या जिओव्हाना एव्हेलिस, भारताच्या निधी गुप्ता आणि युरोपियन युनियनच्या चेरिल मिलर व्हॅन डायक यांचा समावेश होता. काही लोकांच्या हातात संसाधने जमा होण्याच्या गंभीर समस्यांवर उपाय शोधण्यावर या सत्राचा भर होता. अशी संसाधने काही लोकांच्या हातात गोळा झाल्याने त्यांना अवास्तव शक्ती मिळते, तर काहीजणांना त्यांच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागल्याने समस्या निर्माण होतात.

‘शिक्षण आणि कौशल्याच्या माध्यमातून महिलांसाठी मार्ग तयार करणे’ या विषयावरील पाचव्या सत्राचे संचालन डब्ल्यू 20 कृती दलाचे अध्यक्ष आणि युरोपियन युनियनच्या डिजिटल लीडरशिप इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि संचालक चेरिल मिलर व्हॅन डीक यांनी केले. चर्चासत्र सदस्यांमध्ये डब्ल्यू 20 त्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा, लेखिका आणि विद्यापीठाच्या अध्यक्ष डॉ. रजिता कुलकर्णी; आंतरराष्ट्रीय भागीदारी कार्यालयाच्या प्रमुख आणि केसेनिया शेवत्सोवा यांचा समावेश होता. पॅनेलच्या सदस्यांनी महिला आणि मुलींना कौशल्य विकास आणि शिक्षणाद्वारे सक्षम बनवण्याच्या गरजेवर भर दिला. कौशल्य विकासाद्वारे मुलींना उपलब्ध असलेल्या उत्पन्नाच्या संधी स्वीकारण्याचे मार्ग तयार केले जातील आणि नवीन उद्योजक सेटअप देखील तयार होतील परिणामी संरचनात्मक परिवर्तन होऊन आर्थिक वाढीस हातभार लागेल.

दिवस अखेर भारतातील महिलांच्या नेतृत्वाखालील विकास या विषयावरील विशेष सत्राने झाली. या सत्राची सुरुवात डॉक्टर संध्या पुरेचा यांनी केली. या चर्चासत्रात डब्ल्यू 20 इंडोनेशियाच्या अध्यक्ष ऊली सिलाही, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्ता बन्सुरी स्वराज सहभागी झाल्या होत्या. ” माझ्या भारत भूमीमध्ये आपले स्वागत आहे या भूमीत समृद्धीचे प्रतिनिधित्व लक्ष्मी देवी करते धैर्याचे प्रतिनिधित्व देवी दुर्गा करते आणि ज्ञानाचे प्रतिनिधित्व देवी सरस्वती करते” असे बन्सुरी स्वराज यावेळी बोलताना म्हणाल्या. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा दंडाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी उपस्थिताना छत्रपती संभाजीनगरशहराच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची माहिती दिली.

जी -20 नेत्यांचे घोषणापत्र आणि जी 20 संप्रेषणावर प्रभाव टाकणे तसेच महिला उद्योजकांसोबत सक्रिय सहभाग सहमती निर्माण करण्यासाठी पावले उचलणे आणि लिंग समानता वाढवणाऱ्या आणि महिला विकासाबाबत विषयपत्रिका तयार करणाऱ्या धोरणांसाठीच्या वचनबद्धतेवर डब्ल्यू -20 मध्ये भर दिला जाणार आहे.

Exit mobile version