Site icon HW News Marathi

पंतप्रधानांची भेट घेऊन सुद्धा राज्याचे प्रश्न मांडले नाही हे राज्याचे दुर्दैव! – सुप्रिया सुळे

मुंबई | “पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली तेव्हा राज्याच्या वतीने ईडी सरकारमधील लोकसभा सदस्यांपैकी कोणीही सीमाप्रश्न अथवा इतर प्रश्न मांडले नसतील तर ते राज्याचे दुर्दैव आहे”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ईडी सरकारवर टीका केली. ईडी सरकारमधील सत्तेत असलेल्या सदस्यांपैकी एकाही सदस्याने पार्लमेंट सुरू होऊन तीन दिवस उलटून देखील राज्यातील कोणत्याही विषयाबद्दल बोलेले माझ्या कानावर आलेले नाही, असे सुप्रिया म्हणाल्या. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज तसेच राज्यातील इतर प्रश्नांवर अतिशय असंवेदनशीलपणे ईडी सरकार वागत आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

 

तसेच पुढे सुप्रिया म्हणाल्या की, या चर्चेमध्ये सर्वपक्षीय सहभाग अपेक्षित होता जर एकत्रितपणे गेलो असतो तर जास्त योग्य ठरले असते. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित करायला हवी होती. यापूर्वी अशा काही घटना घडल्या की तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी पक्षपात न करता राज्य ही पहिली अशी भूमिका घेतली. मात्र विद्यमान सरकारमधील मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री राज्याच्या हितासाठी कुठेही विरोधी पक्षाला विश्वासात घेताना दिसत नाही. सीमाप्रश्नाचा वाद चिघळला त्यावेळी पहिले चोवीस तास राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे राज्य सरकार कोणतीही भूमिका घेत नाहीत व चूकीच्या गोष्टींची पाठराखण करत आहेत हे राज्याचे दुर्दैव आहे असे त्या म्हणाल्या.
Exit mobile version