HW News Marathi
देश / विदेश

कॅन्सरसारख्या असाध्य रोगालाही प्रदूषणाच्या बळींनी मागे टाकले !

मुंबई | हिंदुस्थानातील हवेचे प्रदूषण अत्यंत धोकादायक पातळीवर पोहचले आहे. प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस झपाटय़ाने वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. हवेतील प्रदूषणाने आता इतके जीवघेणे रूप धारण केले आहे की कॅन्सरसारख्या असाध्य रोगालाही प्रदूषणाच्या बळींनी मागे टाकले आहे. देशातील तमाम राज्य सरकारे, केंद्रीय सरकार खास करून पर्यावरण विभागाने खडबडून जागे व्हावे अशी धक्कादायक माहिती वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणाऱ्या एका सरकारी संस्थेच्या अहवालातून पुढे आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून देशात वाढत असलेल्या प्रदूषणावर चिंता व्यक्त करत पर्यावरण विभागाने खडबडून जागे व्हावे असे सांगितले आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

प्रदूषणासंदर्भात जाहीर झालेला भयंकर अहवाल आणि त्यातील बळींचे आकडे वाचून जगाच्या पाठीवरील केवळ एकच देश शांत बसू शकतो. त्याचे नाव हिंदुस्थान! हाच अहवाल जर एखाद्या पाश्चात्त्य देशात उघड झाला असता तर एव्हाना तेथील जनता रस्त्यावर उतरली असती आणि प्रशासकीय यंत्रणा व सरकारला त्यांनी सळो की पळो करून सोडले असते. आपल्याकडे ते होणे नाही.

हिंदुस्थानातील हवेचे प्रदूषण अत्यंत धोकादायक पातळीवर पोहचले आहे. प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस झपाटय़ाने वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. हवेतील प्रदूषणाने आता इतके जीवघेणे रूप धारण केले आहे की कॅन्सरसारख्या असाध्य रोगालाही प्रदूषणाच्या बळींनी मागे टाकले आहे. देशातील तमाम राज्य सरकारे, केंद्रीय सरकार खास करून पर्यावरण विभागाने खडबडून जागे व्हावे अशी धक्कादायक माहिती वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणाऱ्या एका सरकारी संस्थेच्या अहवालातून पुढे आली आहे. केवळ सरकारी विभागच नव्हे तर देशातील उद्योजक, कारखानदार आणि एकूणच देशवासीयांनी आत्मपरीक्षण करून हवेतील घातक पातळीवर पोहोचलेल्या प्रदूषणाविषयी तातडीने पावले उचलणे आता आवश्यक झाले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या सरकारी संस्थेने देशातील हवेच्या प्रदूषणाचा जो अभ्यास केला आहे तो खरे तर देशवासीयांची झोप उडवणारा आहे. देशातील 77 टक्के जनतेला हवेतील प्रदूषणाचा फटका बसत असल्याचा निष्कर्ष या संस्थेने काढला आहे. तंबाखू सेवनामुळे जेवढे मृत्यू देशात होतात त्याहीपेक्षा अधिक मृत्यू हवेतील प्रदूषणामुळे होत आहेत. हे प्रमाण

थोडेथोडके नाही तर

देशातील प्रत्येक आठ व्यक्तींपैकी एकाचा मृत्यू दूषित हवेमुळे होत असल्याचे भयंकर निरीक्षण ‘आयसीएमआर’ने आपल्या अहवालात नोंदवले आहे. 2017 या एकाच वर्षात हिंदुस्थानातील तब्बल 17.4 लाख लोक हवेतील प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, प्रदूषणाच्या राक्षसाने हिंदुस्थानला मगरमिठीच मारली असून तो दररोज देशातील नागरिकांना गिळंकृत करीत सुटला आहे. आजवर घडलेल्या दोन महायुद्धांत ज्याप्रमाणे मोठी प्राणहानी झाली त्याच पद्धतीने किडय़ामुंग्यांप्रमाणे मरण यावे अशा पद्धतीने प्रदूषणामुळे देशवासीयांचे हकनाक बळी जात आहेत. श्वसनाचे आजार, फुप्फुसातील संसर्ग, हृदयरोग, स्ट्रोक, मधुमेह आणि यकृताचा कर्करोग अशा एक ना अनेक आजारांचे मूळ हवेच्या प्रदूषणातच दडले आहे, असे हा अहवाल सांगतो. एवढय़ा मोठय़ा संख्येने लोक मृत्युमुखी पडत असताना या देशातील सरकार, जनता, ऊठसूट प्रत्येक विषयात लक्ष घालणाऱ्या स्वयंसेवी संस्था सगळेच चिडीचूप आहेत. प्रदूषणाच्या बाबतीत पाश्चात्त्य देश जेवढे जागरुक आणि संवेदनशील आहेत तो पिंड हिंदुस्थानचा कधीच राहिला नाही. जन्मल्यापासूनच धूळ आणि धुराची आपल्याकडे अशी काही सवय लागते की आपण प्रत्येक

श्वासागणिक विष ग्रहण

करतोय हे आपल्या जनतेच्या गावीही नसते. प्रदूषणासंदर्भात जाहीर झालेला भयंकर अहवाल आणि त्यातील बळींचे आकडे वाचून जगाच्या पाठीवरील केवळ एकच देश शांत बसू शकतो त्याचे नाव हिंदुस्थान! हाच अहवाल जर एखाद्या पाश्चात्त्य देशात उघड झाला असता तर एव्हाना तेथील जनता रस्त्यावर उतरली असती आणि प्रशासकीय यंत्रणा व सरकारला त्यांनी सळो की पळो करून सोडले असते. आपल्याकडे ते होणे नाही. विषारी वायूंचा धूर आणि त्यांचा वाढता प्रादूर्भाव हे हवेतील प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. अवकाशात विषारी वायू सोडणारे देशातील लाखो कारखाने आणि कोटय़वधी वाहनांच्या सायलेन्सर्समधून बाहेर पडणारा विषारी धूर यामुळे वातावरणाच्या हृदयालाच छिद्र पडले आहे. माणसाला हृदयरोग झाला तर अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी किंवा पेसमेकर वगैरे बसविण्याची सोय असते, पण निसर्गनिर्मित आच्छादनालाच भगदाड पडल्यामुळे अवकाशाला गंभीर हृदयरोग जडला आहे आणि त्यावर उपचार करण्याची कुठलीही सोय अजून तरी उपलब्ध नाही. प्रदूषणाचे भयंकर पातळीवर पोहचलेले प्रमाण कमी करणे हाच त्यावर एकमेव उपाय आहे. मात्र लाखोंच्या संख्येने लोक मृत्युमुखी पडत असतानाही प्रदूषणाच्या राक्षसाचा मुकाबला करण्यासाठी कुठलेही ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत हे या देशाचे दुर्दैव आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#AyodhyaVerdict : अयोध्या निकालानंतर व्यक्त होणे टाळा, अफवांवर विश्वास ठेऊ नका

News Desk

लोकसभेतील खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna

जखम कुणालाही होवो नुकसान आपल्या देशाचचं होणार – राहुल गांधी

News Desk