बीड | भाजपने किरीट सोमय्या आणि नवनीत राणांना रोजगार मिळवून दिला आहे. कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने जी जी विकासाची काम केली, त्यांचा जनतेला विसर पडण्यासाठी हा गोंगाट आणि षडयंत्र आहे, असं म्हणत भाजपच्या मुंबईतील दांडिया कार्यक्रमावरून विधिमंडळाच्या उपसभापती नीलम गोरे यांनी भाजपवर टीका केली आहे. त्या बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या..
यावेळी नीलम गोरे म्हणाल्या की “प्रत्येक पक्षाला स्वतःच्या मतदारांना त्यांच्याशी एकत्र जोडण्यासाठी त्यांना काम करावं लागतं. त्यामुळे त्यांना काय काम करायचे ते त्यांनी जरूर करावं. मला असं दिसतंय त्यातल्या दोन लोकांना त्यांनी अगदी रोजगार मिळवून दिलाय. एक म्हणजे किरीट सोमय्या आणि दुसरं म्हणजे नवनीत राणा, त्यामुळे त्यांच्या त्या दोघांच्या रोजगारांमुळे, बाकी राजकीय काम करण्याऐवजी स्वतःचं काम करण्याऐवजी, कुणाला तरी नाव दे… कोणाची तरी टिंगल टवाळी कर.. नावाच्या मधला उपाहास कर…याच्यापलीकडे काहीच नाही. त्याचबरोबर राज्य सरकारने जे जे पूर्वी काम केलेले आहे. त्या प्रत्येक गोष्टीला स्थगिती देण्याचा उद्योग चाललेला आहे.”
“त्याचबरोबर केंद्र सरकार बद्दल बोलायचं झालं तर खासदार निधी सर्व काढून घेतलाय. केंद्र सरकारने आणि तो निधी कुठे वापरला याउलट नव्या सरकारने आमदार निधी दोन कोटी वरून चार कोटी केला. त्यामुळे कोविडमध्ये मविआ सरकारने जे जे काम केलं, त्या सर्व कामांचा जनतेला विसर पडावा, म्हणून हे सर्व गोंगाट आणि लोकांचे लक्ष त्यावरून उडवण्यासाठीच हे षडयंत्र आहे”, असं म्हणत भाजपकडून सुरू असणाऱ्या कार्यक्रम आणि मेळाव्यावरून नीलम गोरे यांनी टीका केलीय.