मुंबई | “आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक केले नाही किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळाले नाही”, अशी टीका भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना पत्र लिहून केली आहे. या पत्रात नितेश राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे.
“छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाही तर स्वराज्य रक्षक होते”, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात केले. अजित पवारांच्या वक्तव्यविरोधात राज्यभरात आंदोलन सुरू आहेत. तर “औरंगजेब हा हिंदू द्वेष्टा नव्हता”, असे वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना दिली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाडांना पत्र लिहिले आहे.
To @Awhadspeaks pic.twitter.com/xXOkHbdnpM
— nitesh rane (@NiteshNRane) January 4, 2023
नितेश राणे म्हणाले, “काकाप्रमाणे पुतण्यांही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर ‘ नाहीत असे घोषीत करतो. औरंगजेबाने धर्मांतर करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना नरक यातना दिल्यातरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदूधर्मासाठी बलिदान दिले.आपल्या माहितीकरता मी आपल्याला या पत्रासोबत औरंग्याने तोडलेल्या हिंदू मंदीरांची यादी देत आहे. मला खात्री आहे, आपण हे तथ्य आपल्या मुघलशाहीच्या आस्थेपोटी स्वीकारणार नाही.”
“औरंगजेबाबाबत ”औरंगजेब क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना?“ असे केलेले वक्तव्य स्वाभिविकच आहे, कारण आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे हे केव्हाच सिद्ध झाले आहे. कारण त्यांनी आपल्या तहआयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक केले नाही किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळाले नाही,” असे पत्रता लिहिले आहे.