मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांचा नियोजित कार्यक्रम रद्द करून दिल्लीच्या (Delhi) दिशेने रवाना झाले आहेत. राज्यातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात काल (3 ऑगस्ट) आणि आज (4 ऑगस्ट) दोन दिवस चर्चा झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयाने 8 ऑगस्ट रोजी होणार आहे. यानंतर फडणवीसांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द करत दिल्लीच्या दिशेने रवाना झाले असून फडणवीस दिल्लीला जाऊन राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet meeting) करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील सत्तांतरावर सुनावणी पुढे ढकलली आणि फडणवीसांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून महिना उलटून गेला तरी सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून विरोधकांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. फडणवीस हे दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी आजच्या सर्व प्रशासकीय बैठक रद्द करण्यात आली. सततच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली असून डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.