मुंबई | “औरंगजेब आता तुमचा अचानक कसा नातेवाईक झाला. औरंगजेब तुमचा कोण लागतो की, तुम्ही त्या निर्णयाला स्थगिती देताय?,” असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला केला आहे. शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबईतील प्रस्ताविक आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि.बा.पाटील असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या नामांतर निर्णय स्थगित केला आहे. या पार्श्वभूमीवर राऊत नागपूर दौऱ्यावर आज (15 जुलै) माध्यमांशी बोलताना शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले.
राऊत म्हणाले, “माझा त्यांना प्रश्न आहे की, तुम्ही काय साध्य करताय, एका बाजूला तुम्ही राज्यभरात शिवसेनेने हिंदुत्व सोडले असे म्हणतात आक्रोश करत आहात. आणि दुसऱ्या बाजुला तुम्ही यासंदर्भात शिवसेनेने जे निर्णय घेतलेले आहे. लोकांची भावना आणि लोकांचा आग्रह आहे. औरंगाबाद, उस्मानाबादसंदर्भात हे निर्णय कशा करता घेतले आहे. राजकीय निर्णय मी समजू शकतो. आर्थिक निर्णय मी समजू शकतो. बुलेट ट्रेनविषयक मी निर्णय समजू शकतो. औरंगजेब आता तुमचा अचानक कसा नातेवाईक झाला. औरंगजेब तुमचा कोण लागतो की, तुम्ही त्या निर्णयाला स्थगिती देताय?, हा उस्मान कोण लागतो तुमचा?, श्रीरामांच्या काळातला आम्ही धाराशिव केले. आणि तुम्ही उस्मानाबाद नाव परत ठेवताय. दि.बा. पाटलासंदर्भातील निर्णय हा एक लोकभावनेचा आदर म्हणून घेतलेला निर्णय आहे. आणि तेव्हा तुम्ही सुद्धा पाठिंबा दिला होता. मला वाटते हे सरकार गोंधळलेले आहे. या सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे. त्यामुळे त्यांचा मेंदू बधीर झालेला आहे. त्यामुळे फक्त स्थगिती, स्थगिती आणि स्थगिती पण स्थगिती देतानाही यांनी आपला विवेक हरविलेला आहे.”
संबंधित बातम्या
ठाकरे सरकारच्या नामांतराला शिंदे सरकारनी दिली स्थगिती