मुंबई | ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) या दोघांमधील वाद हा महाराष्ट्रासाठी नवीन नाही. हे दोघे नेहमी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत असतात. आता पुन्हा एकदा दोघांमध्ये नवीन वाद समोर आला आहे. जळगावमध्ये आज (21 नोव्हेंबर) जिल्हा नियोजित समितीची बैठक होती. या बैठकीदरम्यान महाजन-खडसे हे दोन्ही नेते एकमेकांसमोर आले होते. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. परंतु, ही बैठक झाल्यानंतर एकनाथ खडसेंच्या मुलांची हत्या की आत्महत्या?, असा सवाल गिरीश महाजनांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
गिरीज महाजन म्हणाले, “अरे बाबा, मुलगा नसने हे काही दुर्दैव नाहीये. मला मुली आहेत, हे सुदैवच आहे. मी खूप आनंदी आहे. माझा त्यांना प्रश्न आहे की, खडसेंनाही एक मुलगा होता. त्याचे काय झाले. याचे खडसेंनी उत्तर द्यावे. खरे तर मला हा विषय बोलायचा नाही. पण, ते जर माझ्या मुला बाळांवर जात असतील, तर मग खडसेसाहेबांना एक मुलगा होता. 32-33 वयात त्याचे काय झाले?, कशामुळे झाले?, हा ही संशोधनाचा विषय आहे. मी जर बोललो, मग, त्यांना जास्त झोबेल. मुलगा असून आपल्या मुलाचे काय झाले?, आत्महत्या झाली का त्याचा खून झाला? हे तपासण्याची गरज आहे.”
महाजनांच्या आरोपावर खडसेंनी प्रत्युत्तर देत म्हणाले
महाजनांच्या खडसेंवर वैयक्तिक टीका केल्यावर त्यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, “गिरीश महाजन हे सध्या गैराश्यानी ग्रासलेले आहेत. या ठिकाणी काय बोलावे, हे त्यांना सूचत नाही. अशा प्रकारे खालच्या पातळीचे राजकारण मी कधी केले नाही. महाजनांचे अनेक उद्योग मला माहिती आहेत. माझ्या मुलाचा खून झाला की आत्महत्या झाली. हे सरकारमध्ये आहेत, केंद्रमध्ये त्यांचे सरकार आहेत. त्यांना अशी शंका असेल तर त्यांनी चौकशी करायला माझी काही हरकत नाही. कारण त्यावेळी मी घरी नव्हतो, फक्त दक्षता आणि माझा मुलगा हे दोघेच होते. म्हणजे दक्षताने खून केला असे त्यांचे म्हणणे असेल, तर त्यासंदर्भात सीबीआय वैगेरे अणखी काही यंत्रणा आहेत. त्यांच्या मार्फत चौकशी करावी.”
नियोजन समितीमध्ये नेमके काय झाले
जळगाव जिल्हा नियोजन समितीचे आज पहिली बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामविकास मंत्री, भाजपचे नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गुलाबराव पाटील नेते उपस्थित होते. हे तिन्ही नेते उपस्थित असल्याने जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बैठकीत अधिकाऱ्यांनी औषधींसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी खर्च करण्याबाबतचा प्रश्न मांडला होता. यावरून खडसेंनी जिल्हा नियोजन समितीतून औषधींसाठी निधी खर्च करण्याची गरज काय?, वैद्यकीय शिक्षण विभागातून औषधींसाठी निधी का वापरत नाहीत? या औषधींचा खर्च का करू नये?, कोरोना काळातील औषधींसाठीचा हा निधी आहे का?, असे अनेक सवाल खडसेंनी बैठकीत अधिकाऱ्यांना आणि महाजनांना लक्षकडून केले होते. खडसेंनी केलेल्या प्रश्नावर बोलताना महाजन म्हणाले, “हे पैसे तुमच्या घरातून जात आहेत का?,” असे प्रत्युत्तर दिले. यावेळी महाजनांनी औषधींसाठी पैसे खर्च करतात, याची माहिती बैठकीत दिली. यानंतर गुलाबराव पाटील यांनी मध्यस्थी करत यातून मार्ग काढण्याचे सांगितले. यानंतर खडसे आणि महाजन यांच्यातील वाद काहीसा शांत झाला