Site icon HW News Marathi

जाणून घ्या…प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्या वादामागचे नेमके कारण काय?

मराठीत एक म्हण आहे, दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी बघितल्या तर असेच काहीसे होतेय की काय अशी शंका येते. झालेय तर काय…

प्रकाश आंबेडकर- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मागील आठवड्यात युती जाहीर करून “आमचं ठरलाय” अशी कबुली दिली. मुंबईतल्या BMC निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही युती ठाकरेंसाठी फार महत्त्वाची मानली जाते. पण, या नव्या युतीमुळे जुन्या युतीमध्ये मात्र आता खटके उडताना दिसत आहेत. वरवर पाहिले तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुरुवातीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकरांच्या नव्या युतीचे स्वागत केले. परंतु, प्रकाश आंबेडकरांचा (Prakash Ambedkar) वंचित पक्ष महाविकास आघाडीतला चौथा पक्ष होणार की नाही. यावर महाविकास आघाडीमध्ये अद्याप मात्र एकमत झालेले दिसत नाही. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत आपले जुना भांडण आहे. प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. तर दुसरीकडे शरद पवारांनीसुद्धा याबद्दल महाविकास आघाडीत काही चर्चा झाली नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेत दिले आहे. परंतु, महाविकास आघाडीतील या भांडणाचा फायदा भाजपला होतोय का? की हे भांडण फक्त एक दिखावा आहे. किंवा वेगळी राजकीय खेळी आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गेल्या आठवड्यात प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने युतीची घोषणा केली. युतीनंतर महाविकास आघाडीमध्ये सामील होणार का?, असा सवाल विचारल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मला माहिती नाही, मी या भानगडीतच पडत नाही.” शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मात्र त्यांनी त्यांच आणि पवारांचे भांडण जुनच आहे”, असे म्हटले. पण हे सर्व इथेच थांबत नाही. प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांना “भाजप  एजन्ट” म्हणण्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासोबतही त्यांची तू तू मैं मैं झाली.

मग प्रश्न असा आहे की, शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर या दोघांमधील हे जुने भांडण काय आहे? त्याची सुरुवात कशी झाली आणि कोणी केली ? 

यासाठी आपल्याला थोडे इतिहासात डोकवाव लागेल. वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्या अगोदर प्रकाश आंबेडकर भारिप बहुजन पक्षाचे अध्यक्ष होते. त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात १९८४-८५ पासून केली. त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचा दबदबा होता. प्रकाश आंबेडकर यांचा वोटर बेस हा दलित, OBC, भटक्या विमुक्त जाती अशा समाजात बनलेला होता. तर शरद पवार यांचा वोटर बेस हा मराठा होता. आणि आजही आहे. आता या दोन समुदायांमधील जातीय संघर्ष काही नवीन नाही. त्यामुळे आंबेडकर आणि पवार यांचे परस्परविरोधी राजकारण यात उभे राहील. याशिवाय आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांपैकी आधी रा सु गवई आणि नंतर रामदास आठवले याना शरद पवारांनी अधिक पाठिंबा दिला. त्यामुळेही आंबेडकर आणि पवारांमध्ये वाद असू शकतो. अगदी अलीकडचे कारण सांगायचे तर प्रकाश आंबेडकरांची ताकद वाढलेली आहे. २०१९ च्या निवडणुकीत जरी प्रकाश आंबेडकरांना एकही सीट मिळाली नसली तरी जवळजवळ २५ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीची मत फोडल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. काँग्रेस राष्ट्रवादीनेसुद्धा प्रकाश आंबेडकरांचा पक्ष भाजपची बी टीम आहे, असा आरोप केला. आंबेडकर मात्र वेळोवेळी हा आरोप फेटाळत आलेत. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांमधल्या राजकीय दुराव्याच हेसुद्धा एक कारण असू शकते.

पण या दोघातल्या राजकीय विरोधाचा परिणाम आता उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीवर होताना दिसत आहे. या सर्वात विचार करायची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांचे मौन. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांविरोधी केलेल्या वक्तव्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरेंनी यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. संजय राऊत बोलले पण उद्धव  ठाकरेनी अजूनही त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांसोबतच्या युतीच्या मदतीने नैतिक आधार घेऊन उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा विचार करत आहेत का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली.

उद्धव ठाकरेंनी असे करण्यामागचे नेमके कारण काय ?

आता आपण म्हटले, यामागे शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता असू शकते. तर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण महाराष्ट्राचे गेल्या काही वर्षातील राजकारण बघितले तर इथे अशक्य असे काहीच नाही, असे समजते. कारण म्हणजे हा NDTV नुकताच त्यांचा एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. स्वाती चतुर्वेदी यांनी लिहिलेल्या या रेपोर्टनुसार, भाजप पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसोबत हातमिळवणी करण्यासाठी उत्सुक आहे. त्याप्रमाणे भाजप वाटचाल करत आहे. या रेपोर्टमध्ये म्हटले, “भाजपने एका अब्जाधीश उद्योगपतीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना संपर्क करायचा प्रयत्न केला होता. एवढेच नाही तर भाजपमधील एक महत्वाचा नेता या सर्व घटनांना वाटाघाटीपर्यंत घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आहे. पण २०१९ मध्ये झालेल्या वादानंतर दोन्ही पक्षांत इतकी कटुता निर्माण झालीये की उद्धव ठाकरे याबाबत फार उत्सुक नाहीत. पण, अस जरी असले, तरी राजकीय खेळी पालटण्याची शक्यता नाकारता येत नाहीत.

२०२४ च्या आधी भाजपच्या हातात फक्त ४०० दिवस आहेत. भाजपने आगामी लोकसभेची तयारी सुरु केली. पण हा रास्ता सोपा नाही. प्रधानमंत्री मोदींची सलग तिसरी टर्म जिंकावी अशी महत्त्वाकांक्षा आहे. पण, नुकत्याच आलेल्या सी वोटरच्या सर्वेनुसार भाजप २०२४ जिंकायचे शक्यात जास्त असली तरी अनेक राज्यात पक्षाची पकड कमी होईल, असे दिसून येते आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांपैकी ३४ महाविकास आघाडीला जाऊ शकतात, अशी शक्यता सुद्धा यात वर्तवली गेली. त्यामुळे भाजपसाठी ही नक्कीच धोक्याची घंटा आहे. या व्यतिरिक्त भाजप २०२४ मध्ये एकटा पडू शकतो. शिंदेंची बाळासाहेबांची शिवसेना जरी भाजपसोबत असली तरी सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगात शिवसेना कोणाची हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. जर निकाल ठाकरेंच्या बाजूने लागला तर शिंदे गटासोबत भाजपचे भवितव्य सुद्धा धोक्यात येऊ शकते. या रिस्कच अंदाज भाजपला असेलच, अशा परिस्थितीत एकच उत्तम पर्याय म्हणजे महाविकास आघाडी फोडणे हा आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही भाजपपासून वेगळी झाली असली तरी दोन्ही पक्षांची विचारधारा हिंदुत्वाची आहे. या आधारावर हे दोन पक्षसोबत येऊ शकतात.

 

NDTV रिपोर्टमध्ये नेमके काय म्हटले

दरम्यान, NDTV रिपोर्टनुसार, राज्यपालांची राजीनामा देण्याची तयारी उद्धव ठाकरेंना मनविण्यासाठी भाजपकडून सुरु असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, राज्यपालांसोबत त्यांचे अनेक वाद झाले. विधान परिषदेच्या नियुक्त्या रोखणे, कोरोना काळात  मंदिर प्रवेश बंदी असो किंवा अगदी अलीकडेच राज्यपालांनी महापुरुषांविषयी केलेली आक्षेपार्ह वक्तव्य असोत. अनेक वेळा उद्धव ठाकरे आणि राज्यपाल यांच्यामध्ये खटके उडालेत हे संपूर्ण महाराष्ट्रांनी पाहिले आहे. यानंतर राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. तरीही राज्यपालांनी राजीनामा दिला नाही. आणि आता अचानक मात्र त्यांनी स्वतःहून पदमुक्त होण्यासाठी पंतप्रधान राज्यपालांनी पत्र लिहिले. त्यामुळे राज्यापालांचा राजीनामा घेणे हे भाजपकडून उद्धव ठाकरेंची एक गिफ्ट असण्याची शक्यता या रिपोर्टमध्ये वर्तवली जात आहे.

यात अगदी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेना भाजप पुन्हा एकत्र यावे. यासाठी भाजपचे हाय कमांडने या हालचाली केल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आगामीत काळात महाराष्ट्र भाजपमध्येसुद्धा काही बदल झाल्यास नवल वाटायला नको. २०२२ च्या जुलैमध्ये झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एक रिंकीय प्रस्ताव पारित झाला. या प्रस्तावात महाराष्ट्रातल्या भाजप कामगिरीचा उल्लेख फक्त २ वाक्यात करण्यात आला होता. त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नावसुद्धा नव्हते. सूत्रांच्या मते, राज्यातील सत्तापालटानंतर महाराष्ट्र भाजप नेतृत्वाला हाय कमांडकडून प्रशंसेची अपेक्षा होती. पण, याविरुद्ध त्यांना दुर्लक्षित केले गेले. देवेंद्र फडणवीसांचे डिमोशन करून त्यांना उपमुख्यमंत्री बनवणे हासुद्धा केंद्रीय नेतृत्वाकडून एक मेसेज होता, असे म्हटले जात. त्यातच फडणवीसांना दिल्लीत जागा करून महाराष्ट्रातील राजकारणापासून दूर नेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, ही चर्चा तर सुरूच आहे.

पण एवढे असूनसुद्धा काही प्रश्न असतीलच सर्वात पहिला म्हणजे एकनाथ शिंदेंचे काय? गेल्या वर्षीच्या अभूतपूर्व बंडाळीनंतर उद्धव ठाकरे शिंदेंना स्वीकार करतील का? नाही केले तर शिंदे भाजपमध्ये जातील का? मुख्यमंत्रीपदावरूनच आधी भाजप-सेनेत वाद झाला होता. यावेळी भाजप नमते घेईल का? असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे पडद्यामागे घडामोडी तर चालू आहेत पण त्या किती यशस्वी होतील याबद्दल आशंका आहे.

 

Exit mobile version