मुंबई | “अजूनपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) का होत नाही. हे फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनाच माहिती आहे,” असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातील इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. अतिवृष्टी व पूरामुळे झालेले शेतजमीन आणि पिकांचे नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधीमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलावण्याची मागणी अजित पवारांनी आज (25 जुलै) पत्रकार परिषदेतून केली आहे.
अजित पवार म्हणाले, “तुम्हाला बहुमत आहे, तुम्ही त्या ठिकाणी ताबडतोब मंत्रिमंडळ अस्तित्वात आणा. अजूनपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही. हे फक्त आणि फक्त एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनाच माहिती आहे. त्या दोघांच असे वाटते की, आपणच सरकार चालवितेय ते बरे आहे. बाकी कोणाचा त्रास नाही म्हणून त्यांचे चाले की आणखी काय चालेय. वास्तविक लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने वागून चालत नाही. कारण असे प्रसंग येतात, अशा वेळी पालमंत्र्यांची जबाबदारी फार महत्वाची असते.”
“भाजपची भूक किती मोठी?” अजित पवार यांचा सवाल
“जे भूकंप भूकंप करणाऱ्यांनी आता राज्य ताब्यात घेतले आहे ना. ते व्यवस्थित पणे चालवा ना, ज्या समस्या आहेत. त्या सोडवाणा, आता एवढे बहुमत एकनाथराव शिंदेंना घेऊन पण समाधान नाही झाले का? अजून भूक किती मोठी आहे. ती तरी एकदा कळू द्या. सरकारमध्ये येण्यापुर्ती भूक होती. ती आता भागवली, धोडा दगड छाताडावर कुठे ठेवून कोणला काय माहिती.” अजित पवार पुढे म्हणाले, “भला मोठा दगड नाही ठेवला, नाही तर जीवच गेला असता. झेपेल असाच दगड ठेवला. आता कश्यावर दगड ठेवला हे त्यांचे त्यांनाच माहिती. फक्त मी याविषयावर जास्त बोलत नाही.”
विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातील भागात ओला दुष्काळ जाहीर करा
विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातील इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही पत्र लिहिले असून राज्यात झालेल्या नुकसानीची गंभीरता राज्यशासनाच्या लक्षात आणून दिली आहे. अजित पवारांनी पत्रात म्हटले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात जून महिन्याच्या जवळपास २० तारखेपासून ते आजपर्यंत सातत्याने पाऊस पडत आहे. राज्यातील काही भागांमध्ये मी स्वत: पाहणी केली असून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याशी सातत्याने दूरध्वनीद्वारे संपर्कात आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांने केलेल्या पेरण्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पावसाने जमिनी वाहुन गेल्या असून घराचीही मोठया प्रमाणावर पडझड झाली आहे. स्थावर मालमत्तेचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे पंचनामे अजुनपर्यंत होऊ शकले नाहीत. पूर्वीच या दोन्ही विभागामध्ये शेतकरी अडचणीत असताना मोठया प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होण्याचे प्रमाण निदर्शनास आले आहे. यावर तातडीने त्यांना एक दिलासा म्हणून त्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टींने व आत्महत्या होऊ नये याकरिता या दोन्ही विभागांमध्ये व राज्याच्या इतर विभागामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची नितांत आवश्यकता आहे,” असे म्हटले आहे.
संबंधित बातम्या
विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टीग्रस्त विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची अजित पवारांची मागणी