मुंबई | “प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही मतभेद आहेत ते सर्व संपवून टाकायचे”, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांना केले आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 82 व्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने अजित पवार बोलताना पक्षातील कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
अजित पवार म्हणाले, “आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक नेत्याने आपल्या जिल्ह्यातून स्वतःला आमदार करताना काही आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करा आपण राज्यात पहिल्या क्रमांकावर जाऊ. तसेच प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही मतभेद आहेत ते सर्व संपवून टाकायचे. पवारांनी यशवंतराव चव्हाणांनंतर नेहमीच बेरजेचे राजकारण केले आहे. हे करत असताना आपल्याला आपला पक्ष राज्यात पहिल्या क्रमांकावर न्यायचा म्हटले तर कुठेतरी काहीतरी पुढेमागे करावे लागेल याची खूणगाठ करून घ्यावी.”
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात अनुभवी, सर्वसमावेशक, सर्वामान्य, दूरदृष्टीने नेतृत्व म्हणून पवारांची ओळख आहे. काळवेळ कोणासाठी थांबत नसते यामध्ये आपल्याला बरेच काही करायचे असेल तर ते करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक व्यक्तीने आपले योगदान दिले पाहिजे. ग्रामपंचायतीपासून ते विधानसभा-लोकसभेच्या सर्व निवडणुकीमध्ये साहेबांच्या विचाराची माणसे कशी जास्तीत जास्त निवडून येतील याचा निश्चय करू या, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
महाराजांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्यावरून अजित पवारांनी राज्यपालांवर निशाणा साधला