मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कोल्हापूर येथील कागल आणि साखर कारखान्यावर ईडीने (ED) छापा टाकला आहे. हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांना त्यांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. यानंतर कागल बंद ठेवण्याचे आव्हान समर्थकांनी केल्यानंतर हसन मुश्रीफांनी व्हिडिओच्या माध्यमातून पहिली प्रतिक्रिया दिली.
“मी काही कामानिमित्त बाहेर आहे. आज सकाळपासून माझे घर, कारखाना व नातेवाईकांच्या घरावर छापे सुरू आहेत. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी शांतता राखावी. कागल बंदची घोषणा केली आहे ती कृपया मागे घ्यावी. सरकारी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. कोणताही दंगा किंवा कायदा-सुव्यवस्था अडचणीत येईल”, असे कुठलेही कृत्य न करण्याचे आवाहन हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
लवकरच माध्यमांसमोर येईन खुलासा करणार
“दीड दोन वर्षांपूर्वी अशा प्रकारचे छापे पडले होते. सर्व माहिती केंद्रीय यंत्रणांनी घेतली होती. एक-दोन वर्षापूर्वी कारवाई झाली त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. पुन्हा कोणत्या हेतूने छापा घातला हेही समजते नाही. वास्तविक ३० – ३५ वर्षांचे माझे सार्वजनिक जीवन हे लोकांच्या समोर आहे. या सर्व प्रकाराची माहिती घेतल्यानंतर लवकरच प्रसार माध्यमांसमोर खुलासा करेन”, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
गलिच्छ राजकारण
“कागलमधील भाजपच्या नेत्याने दिल्लीमध्ये अनेक चकरा मारून माझ्यावर कारवाई करावी असे प्रयत्न सुरू ठेवले होते”, असा आरोप हसन मुश्रीफांनी भाजपचे नेता किरीट सोमय्या यांच्यावर केला आहे. हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, “चार दिवसात माझ्यावर कारवाई होणार असे सांगण्यात आले होते. अशा प्रकारे नाऊमेद करण्याचे काम चालले असून हे अतिशय गलिच्छ राजकारण आहे. राजकारणात अशा पद्धतीने कारवाई होणार असेल तर त्याचा सर्वत्र निषेध झाला पाहिजे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
संबंधित बातम्या