Site icon HW News Marathi

लोकशाही व संविधानावर घाला घालणाऱ्या दुरंग्यापासून सावध रहा! – नाना पटोले

मुंबई | देशाला स्वातंत्र्य (Independence Day) मिळवून देण्यात महात्मा गांधी, सरदार पटेल, मौलाना आझाद, पंडित जवाहरलाल नेहरु, नेताजी सुभाषचंद्र बोस या महानायकांसह लाखो स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग, संघर्ष व बलिदानाने १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला व तिरंगा डौलाने फडकला. परंतु या तिरंग्याला न माननारे काही लोक आहेत ते लोकशाही व संविधान संपवण्याचे काम करत आहेत, अशा दुरंग्यापासून सावध रहा व तिरंग्याचा मान, सन्मान कायम राखा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे.

टिळक भवन या काँग्रेसच्या मुख्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सेवादलचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान, आमदार राजेश राठोड, आ. वजाहत मिर्झा, एससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, मा. आ. हुस्नबानो खलिफे, मुनाफ हकीम, प्रदेश उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, राणी अग्रवाल, राजन भोसले, जो. जो. थॉमस, प्रदेश सचिव श्रीरंग बरगे, राजाराम देशमुख, झिशान अहमद यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी जगातील इतर देशही स्वतंत्र्य झाले पण त्यांचे स्वातंत्र्य फारकाळ टिकले नाही कारण त्या देशामध्ये लोकशाही व संविधान नव्हते. आपल्याकडे लोकशाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा काँग्रेसचा विचार होता म्हणून आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. देशाचे विभाजन होऊ नये हा काँग्रेसचा विचार होता पण विभाजनासाठी कोण कारणीभूत होते हे सर्वांना माहित आहे. ज्यांना तिरंगा मान्य नव्हता तेच लोक आज ‘हर घर तिरंगा’ अभियान चालवत आहेत, हा काँग्रेस विचाराचा विजय आहे. तिरंग्याचा मान सन्मान राखला पाहिजे परंतु या इव्हेंटबाजीत तो राखला जात नाही. चीनमधून तिरंगा झेंडे आयात करण्यात आले आहेत, या तिरंग्यात रंग, आकार, अशोक चक्र याचा ताळमेळ लागत नाही.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सर्वांना घर देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. आज अमृत महोत्सव साजरा करत असताना किती लोकांना घरे दिली हे पाहिले तर हा सुद्धा एक जुमलाच निघाल्याचे दिसत आहे. खोटी आश्वासने देऊन लोकांची फसवणूक करण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. स्वतंत्र भारतात शेतकऱ्याला आंदोलनजीवी, आतंकवादी म्हणून अपमानीत केले हे दुर्दैवी आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version