शिवशंकर निरगुडे | “हिंगोली (Hingoli) शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या गद्दारांच्या गाड्या तुमच्या गावात येताच तुम्ही फोडा, तुमचा ‘मातोश्री’वर सन्मान करण्यात येईल,” असे चिथावणीखोर वक्तव्य शिवसेना हिंगोली जिल्हा संपर्क प्रमूख बबनराव थोरात (Babanrao Thorat) यांनी केले होते. या चितावणीखोर वक्तव्यामुळे बबनराव थोरात यांच्या विरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात काल (2 ऑगस्ट) गुन्हा दाखल झाला आहे. बबनराव थोरात यांनी 1 ऑगस्ट रोजी हिंगोली शहरातील महावीर भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्यात चितावणीखोर वक्तव्य केले आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर हे शिंदे गटात गेल्याने हिंगोलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नवा शिलेदार देणार आहेत. या पदासाठी हिंगोली जिल्ह्यातून अनेक जण इच्छुक आहेत आणि याच इच्छुकांना बबनराव थोरात यांनी आवाहन केले होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल (2 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर होते. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काल रात्री हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे.
नेमके काय आहे प्रकरण
हिंगोली येथील आयोजित कार्यकर्त्यांच्या निष्ठा मेळाव्यात चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्याविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला आहे. बबनराव थोरात यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा निष्ठा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात थोरात यांनी मार्गदर्शन केले.
शिवसेना जिल्हा प्रमुख होण्यासाठी इच्छुक असलेल्यांना बबनराव थोरात यांनी आवाहन केले. गद्दारांची वाहने आपल्या गावात आल्यानंतर ही वाहने फोडा, असे बबनराव थोरात म्हणाले होते. गद्दारांची वाहने फोडणाऱ्यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान केला जाईल, असेही थोरात यावेळी बोलले होते. या प्रकरणी हिंगोलीतील सचिन प्रकाश पवार यांनी आज दुपारी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थारोत यांनी शांतता भंग व्हावी, असे वक्तव्य केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. यावरून पोलिसांनी बबनराव थोरात यांच्याविरोधात शांतता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.