मुंबई | “काय लायकी तरी हाय का? उंची किती, डोके केवढे”, अशी जहरी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर केली आहे. शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेला रविवारी (9 ऑक्टोबर) ठाण्यातून सुरू झाली. यावेळी विनायक राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटासह राणेंवर सडकून टीका केली. या महाप्रबोधन यात्रेत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि शिवसेना प्रवक्ता सुषमा अंधारे यांनी भाषणांनी ठाणेकरांचे लक्ष वेधले.
विनायक राऊत म्हणाले, “या महाराष्ट्रामध्ये कर्मवीर झाले, या महाराष्ट्रामध्ये प्रबोधनकार झाले, लोकांनी दिलेली पदवी त्याच महाराष्ट्रामध्ये लोकांनी कोंबडी चोर पदवी दिली. ती ही बिन पैश्यांची, असे म्हणत त्यांनी राणेंवर जोरदार टीका केली. विनायक राऊत पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरेंवर टीका करताना अरे तुरेने बोलतात. आम्ही अरे तुरे नाही करणार. त्यादिवशी त्यांनी विचारले, काय उद्धव ठाकरेंना माहिती आहे. शिवसेना स्थापन झाली, तेव्हा ते सहा वर्षाचे होते. मग, मी सांगितले होय सहा वर्षाचे होते. त्या सहा वर्षामध्ये त्यांच्यावर झालेले सुसंस्कार म्हणून त्यांनी जी आज शिवसेना उभी केली. ज्यावेळेला शिवसेना स्थापन झाली, तेव्हा तू काय करत होतास? उपटत होतास कोंबडीची पिसे उपटत होतास की नाही हे सांग ना? अशी मिश्किल टीका राऊतांनी राणेंवर केली. म्हणून कोंबडी चोर पदवी मिळाली. काय लायकी तरी हाय का? उंची किती, डोके केवढे, कोण म्हणतो दीड फुट्या , कोण म्हणतो कोंबडी चोर, एकदाच संपवले. एकदा नव्हे तर दोन वेळा विधानसभेला आपटी बार केला. निलेश राणेंचा उल्लेख करत राऊतांनी म्हणाले, “मी लोकसभेला त्याला जागा दाखवली असून अजून एकदा या हिजा बिजा तिजा करून टाकू.”
नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंना केले अनेक सवाल
दरम्यान, उद्धव ठाकरे नेमके काय करतात काय? काही न करता ते संपत्तीचे मालक कसे? असा सवाल राणेंनी उद्धव ठाकरेंना केला होता. उद्धव ठाकरेंनी एकदा तरी शिवसैनिकाला मदत केली का?, एकनाथ शिंदेंनी शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवली. शिवसेना पक्ष वाढीसाठी उद्धव ठाकरेंचे नेकमे काय योगदान दिले?, उद्धव ठाकरे हे नुसते आयत्या बिळावर नागोबा आहेत, अशा अनेक सवाल राणेंनी उद्धव ठाकरेंना केले.