मुंबई | राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटासोबत केलेले बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगाजेबच्या आग्रातील सुटकेशी केली आहे. सातारा जिल्ह्यातील प्रतापगड येथे आज (30 नोव्हेंबर) 363 वा शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान, लोढांनी शिंदेंच्या बंडाची तुलना ही शिवाजी महाराजांच्या आग्य्रातील सुटकेशी केली. नुकतेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्तांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. यात आता लोढांच्या विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे. लोढांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
मंगलप्रभात लोढा म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगाजेब बादशाहने आग्य्रातील किल्ल्यात कैद करून ठेवले होते. परंतु, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी औरंगजेबाच्या हातात तुरी देऊन त्यांच्या आग्य्रातील किल्ल्यातून सुटून बाहेर आले. यामुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेंना देखील रोखण्याचे खूप प्रयत्न करण्यात आले होते. परंतु, एकनाथ शिंदे त्यातून बाहेर पडले.”
लोढांवर विरोधकांची टीका
लोढांनी महाराजांना केलेल्या वक्तव्यावर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली. अजित पवार म्हणाले, “वाचाळवीरांना आवरा असे मी सातत्याने सांगतो आहे. तरी देखील यांच्या मनामध्ये काहीना काही कल्पना अशा येतात ते बोलायला एक जातात आणि त्यातून अर्थ वेगळा निघतो. साधी एक भूमिका देखील या लोकांना कळत नाही. एखाद्याला ठेच लागली की दुसरा ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करत असतो हे तर यांच्यात दिसतचे नाही. उलट चढाओढ लागलेली दिसते,” असे ते म्हणाले.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लोढांवर टीका करताना म्हणाले, “बोलण्याच्या ओघात त्यांनी तुलना केल्याचे मी मानत नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. शिवाजी महाराजांचा अपमान हा तर भाजपचा एककलमी कार्यक्रमच झाला आहे.”