Site icon HW News Marathi

भाजपच्या दोन आमदारांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप; निवडणूक आयोगाला तक्रारीचा मेल

मुंबई | विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. विधान परिषदेसाठी आज (20 जून) 285 आमदारांनी मतदान केले आहे. परंतु, भाजपचे आमदार  लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक त्यांच्याऐवजी दुसऱ्या कोणीतरी त्यांची मतपत्रिका मतपेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यासंदर्भात काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मेलद्वारे तक्रार केली आहे. यामुळे विधान परिषदेच्या मतमोजणीला विलंब होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

या निवडणुकीत गुप्त मतदान करण्याची पद्धत आहे. तरी सुद्धा लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची मतपत्रिका दुसऱ्यांच्या हातात दिली, असा आरोप काँग्रेसने केला आहे. विधान परिषदेत मतदान करताना दोन्ही आमदारांनी मतपत्रिकेवर सही केली होती. काँग्रेसने विधान परिषदेत पराभव दिसत असल्यामुळे हा आरोप केला असल्याचे सांगत त्यांच्यावर टीका केली.  भाजपच्या या दोन्ही आमदारांची प्रकृती ठिक नसताना देखील त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबईत आले होते, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.

दरम्यान, राज्यसभा निडणुकीत भाजपने महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील प्रत्येकी एक-एक आमदाराच्या मतावर भाजपने आक्षेप घेतला होता. त्यामुळे मतमोजणीला विलंब झाला होता. तेव्हा मध्य रात्री मतमोजणीला सुरुवात झाली होती. यात महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला होता.

संबंधित बातम्या
विधान परिषदेत ‘मविआ’च्या पदरी निराशा; मलिक, देशमुख मतदानापासून वंचित

 

 

Exit mobile version