HW News Marathi
राजकारण

विधानसभा अध्यक्षपद गांभीर्याने आणि न्यायबुद्धीने सांभाळीन! – ॲड.राहुल नार्वेकर

मुंबई । भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत वैशिष्ट्यपूर्ण स्थान असलेल्या ‘महाराष्ट्र विधानसभा’ या राज्यातील सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे आभार मानले. आपणा सर्वांच्या सदिच्छांसह मी विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यभार नम्रपणे स्वीकारीत असून लोकशाहीतील हे महत्त्वाचे पद मी गांभीर्याने आणि न्यायबुद्धीने सांभाळीन, अशी ग्वाही नार्वेकर त्यांनी दिली.

राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात आज ॲड.राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली. त्यानंतर ते बोलत होते.

ॲड.नार्वेकर म्हणाले, आपली संसदीय लोकशाही सर्व प्रकारच्या राजकीय विचारछटांना स्थान देते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. जनादेशाचा आदर राखणे आणि संसदीय सभ्याचार जपला जाणे आवश्यक आहे. ब्रिटनला संसदीय कार्यप्रणालीची जननी म्हणून ओळखले जाते. राजाचे अधिकार आणि हस्तक्षेप मर्यादित होत तेथील लोकशाही गेल्या 800 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर विकसित होत गेली. प्रगल्भ आणि परिपक्व होत गेली. मात्र तरिही विन्स्टन चर्चिल यांच्यासारख्या तेथील पंतप्रधान आणि मुत्सद्याला “The best argument against democracy is a five-minute conversation with the average voter!” असे का बरे म्हणावे लागले असेल…? चर्चिल साहेबांच्या या मार्मिक अवतरणामध्ये खूप काही दडले आहे. “Speaker has less to speak” याची मला जाणीव असल्याचे सांगून यापुढील काही काळ मला “more to listen” ची भूमिका पार पाडायची असल्याचे नार्वेकर यावेळी म्हणाले.

नार्वेकर म्हणाले, विधानसभेची ही पवित्र वास्तू राज्यातील 14 कोटी जनतेच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतीक आहे. आपणा सारख्या लोकप्रतिनिधींमार्फत या इच्छा-आकांक्षा विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून सभागृहात मांडल्या जाणे आणि त्यानुसार निर्णयप्रक्रियेचे चक्र गतिमान राहणे आवश्यक आहे. यापुढील काळात सभागृहातील कामकाजाचा प्रत्येक क्षण लोकहिताच्या कारणासाठी, निर्णयाभिमुख चर्चेसाठी, विकासाभिमुख नियोजनासाठी आणि समाजातील अंतिम घटकांच्या शोषित वंचितांच्या उद्धारासाठी खर्ची पडेल, यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कायदे करणे हे कायदेमंडळाचे महत्वाचे कार्य आहे. विधेयकांवर दोन्ही बाजूने सांगोपांग चर्चा होऊन येणारा नवीन कायदा अधिकाधिक परिपूर्ण असावा अशी अपेक्षा असल्याचे सांगून यासंदर्भात येत्या काळात परिस्थिती निश्चितच सुधारलेली असेल, त्यादृष्टीने काही व्यवस्था आपण तयार करू, असे ॲड. नार्वेकर यांनी सांगितले.

राज्य विधानसभेला दिग्गज अध्यक्षांची तेजस्वी आणि प्रेरक परंपरा लाभली असल्याची उदाहरणे देऊन या मान्यवरांनी आपल्या संसदीय लोकशाहीचा सन्मान उंचावला असल्याचे अध्यक्ष ॲड.नार्वेकर यांनी सांगितले. बाळासाहेब भारदे यांनी या विधानमंडळाला ‘लोकशाहीच्या मंदिराची’ अतिशय समर्पक उपमा दिलेली आहे. विधानसभा म्हणजे नवभारताचे व्यासपीठ आहे, या जाणीवेने सभागृहातील चर्चेचा स्तर दर्जेदार असायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त करून सर्व सदस्यांनी आपले घटनादत्त कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडावे, असे आवाहनही नार्वेकर यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सभागृहातील ज्येष्ठ सदस्यांचे आपल्याला मार्गदर्शन लाभेल, अशी भावना व्यक्त करून भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षात टिळक- गोखले- आंबेडकर- नाना पाटील- सावरकर यासारख्या महान देशभक्तांची भूमी असलेल्या महाराष्ट्राच्या या सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्षपदी आपण माझी निवड केली हा मी माझ्या आजपर्यंतच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीतील सर्वोच्च बहुमान समजतो, असे ॲड.नार्वेकर यांनी सांगितले. याच सभागृहात असलेल्या हरिभाऊ बागडे, दिलीप वळसे-पाटील, नाना पटोले तसेच कार्यकारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ या चार अनुभवी माजी विधानसभा अध्यक्षांचे आपल्याला मार्गदर्शन लाभेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

प्रारंभी भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी त्याग आणि बलिदान दिलेल्या सर्व आदरणीय नेत्यांना आणि शूरवीरांना तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, या सभागृहाचे आणि लोकसभेचे पहिले अध्यक्ष दादासाहेब मावळणकर अशा सर्व महात्म्यांना नतमस्तक होत ॲड.नार्वेकर यांनी वंदन केले. तसेच या पदावर निवड झाल्यानंतर ज्या सन्माननीय सदस्यांनी आपल्या अभिनंदनपर भावना व्यक्त केल्या ते सर्वश्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सुधीर मुनगंटीवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे, माजी राज्यमंत्री बच्चू कडू, दीपक केसरकर, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, नाना पटोले यांच्यासह सुनील प्रभू, अबू आझमी, किशोर जोरगेवार तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह सर्व सदस्यांचे त्यांनी आभार मानले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींना पाठिंबा मात्र शिवसेनेच्या उमेदवारांना विरोध । नारायण राणे

News Desk

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या अपयशी होण्यामागे एक महिला | शत्रुघ्न सिन्हा

News Desk

नितीन गडकरींनी नौदलाची माफी मागावी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

News Desk