Site icon HW News Marathi

महाराष्ट्रातील सत्तांतरावरील पुढील सुनावणी 27 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली

नवी दिल्ली | महाराष्ट्रातील सत्तांतरावरील याचिकेवरील सुनावणी 27 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे, असे सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme court of india) घटनापीठाने सांगितले आहे. शिंदे गटाने निवडणुकी चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोरी सुनावणीला स्थगिती देऊ नका, अशी याचिका शिंदे गटाने काल (6 सप्टेंबर) केली होती. यानंतर याचिकेवर सरन्यायाधीश उदय लळित यांनी काल (6 सप्टेंबर) तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश दिले. यानुसार, न्यायालयात आज (7 सप्टेंबर) सकाळी 10. 30 वाजता सुनावणी पार पडली. यानंतर न्यायालयाने 27 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली असून 27 सप्टेंबरला न्यायालय दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकणार आहे. सरन्यायाधीशांनी न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्यात आले.

 

दरम्यान, याआधी न्यायालयाने निवडणूक आयोगाला शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भात निर्णय न घेण्याचे लेखी आदेश आहे का? असा प्रश्न घटनापीठाने विचारणा केली असून घटनापीठाने आजच्या सुनावणीत दोन्ही पक्षांच्या बाजू समजून घेतल्या आहेत. यानंतर पुढील सुनावणी 27 सप्टेंबरला होणार असून पुढील सुनावणीत दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून निर्णय देणार आहे, असे घटनापीठाने सांगितले. तसेच शिवसेनेचे चिन्ह गोठवा, अशी मागणी शिंदे गटाचे वकिल कौल यांनी न्यायालयात केली.

 

निवडणूक आयोगाने  शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही घटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी 23 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. शिंदे गटाने सुरुवातीपासूनच आपली शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. यानंतर शिंदे गटाने ‘धनुष्यबाण’वर सुद्धा आपल्या हक्क सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. परंतु, निवडणूक आयोगाने कोणत्याही निर्णय देऊ नये, असा आदेश न्यायालयाने त्यांना दिला आहे.

 

 

Exit mobile version