मुंबई | विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेले राजकारण मला व्यथित करणारे आहे. मी माझ्या भावना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळविलेल्या आहेत”, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबेंच्या (Satyajeet Tambe) विजयावर दिली आहे. संगमनेर तालुक्यात बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिंदे शाही बाणा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांनी ऑनलाईन जनतेशी संवाद साधला.
या कार्यक्रमानिमित्ताने बाळासाहेब थोरात यांनी गेल्या महिनाभरात झालेल्या सत्यजीत तांबेंच्या राजकारणावर पहिल्यांदा आपले मौन सोडून त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखविली ते म्हणाले, “विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेले राजकारण मला व्यथित करणारे आहे. मी माझ्या भावना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळविलेल्या आहेत. यावर राज्य आणि पक्षपातळीवर योग्य निर्णय करू”, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राजकारण झाले ते मला व्यथित करणारे
बाळासाहेब थोरात म्हणाले, “आणखी एक राजकारण मधल्या काळात विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यात खूप राजकारण झाले, सत्यजीत खूप चांगल्या मताने विजयी झाला. याचेही अभिनंदन यानिमित्ताने आपण करत आहोत. फक्त, जे राजकारण झाले ते मला व्यथित करणारे आहे. ही वस्तू स्थिती आहे. याबाबतीत मी माझ्या भावना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळविलेल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे. हे कधी बाहेर फार बोलले नाही पाहिजे, या मताचा मी आहे. आणि म्हणून याबाबती काय जे आहे. मी पक्षश्रेष्ठींना कळविलेले आहे. पक्ष पातळीवर आणि माझ्या पातळीवर त्यामध्ये आम्ही योग्य निर्णय जे काही करायचे आहे ते योग्य पद्धतीने करू. याबाबतीत आपण काही काळजी करण्याचे कारण आहे, असे मला वाटत नाही. यामध्ये आपण पुढे जाऊ. काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. मधल्या काळामध्ये विधान परिषदेचे राजकारण सुरू होते. काही बातम्या अशा आल्या की, पार आपल्याला भाजपपर्यंत नेहून बोचविले. ऐवढेच नव्हे तर भाजपच्या तिकटाचे वाटप देखील करून टाकले. काही लोक कशा पद्धतीने गैरसमज पसरविण्याचे काम करत आहेत. हे आपण पाहिले असेल, अनेक प्रकारच्या चर्चा त्यांनी घडून आलेल्या असल्या तर काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. त्या विचाराने पुढील वाटचाल. आतापर्यंत त्या विचाराने वाटचाल केली, पुढील वाटचाल सुद्धा त्याच विचाराने राहणार आहे. याची ग्वाही आपण देतोय.”