Site icon HW News Marathi

औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याचा प्रस्ताव मंजूर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘या’ शहरांचे बदलेले नाव

मुंबई | औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात करण्यात आला आहे. तर उस्मानाबाद शहराच्या ‘धाराशीव’ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. महाविकास आघाडीची आज (29 जून) मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत औरंगाबद आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, शिवसेनेचे आमदार बंडखोर नेता एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारले आहे. शिंदेसह 40 आमदार आठवड्या भरापासून गोवाहाटीत मुक्कामी होते. शिंदे गटाने आज गुवाहाटीमधील हॉटेलमधून गोव्याच्या दिशेने रवाना झाले असून उद्या मुंबईत  विश्वासदर्शक ठरावासाठी मुंबईत दाखल होणार आहे. राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या गुरूवारदिनांक उद्या (30 जून) सकाळी ११.०० वाजता विधान भवनमुंबई येथे अभिनिमंत्रित करण्यात आले आहे. सर्व विधानसभा सदस्यांना यासंदर्भात विधानमंडळ सचिवालयामार्फत सूचित करण्यात आले असून सर्वांनी सभागृहात उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे. राज्यपाल यांच्या निदेशानुसार हे विशेष अधिवेशन बहुमत चाचणीसाठी अभिनिमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

आज २९ जून २०२२ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

• औरंगाबाद शहराच्या “संभाजीनगर” नामकरणास मान्यता.
(सामान्य प्रशासन विभाग)

• उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव” नामकरणास मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग)

• नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता.
(नगर विकास विभाग)

• राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार. (कृषि विभाग)

• कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार
(विधि व न्याय विभाग)

• अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार
(परिवहन विभाग)

• ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार.
(इतर मागास बहुजन कल्याण विभाग)

• विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय.
(नियोजन विभाग)

• निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय ( सामान्य प्रशासन विभाग)

• शासन अधिसुचना ८ मार्च २०१९ अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय.
(महसूल विभाग)

संबंधित बातम्या
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्यासाठी पत्र पाठविले; उद्या ‘मविआ’ सरकार येणार धोक्यात?
Exit mobile version