Site icon HW News Marathi

महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या मागील मास्टमाईंड कोण?”, अजित पवारांचा राज्य सरकारला सवाल

मुंबई | “महापुरूषांची नावांची यादी आहे ज्यांच्याबद्दल गरळ ओकण्याचे काम, बेताल वक्तव्य करण्याचे काम कशामुळे सुरू आहे, यामागील मास्टमाईंड कोण आहे, हे का थांबत नाही, असे अनेक सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी राज्य सरकारला केले. महाविकास आघाडीने आज (17 डिसेंबर) महामोर्चा भायखळ्यातील रिचर्ड सन्स अँड क्रूडास कंपनी ते सीएसएमटी रेल्वे स्टेशनपर्यंत (टाईम्स ऑफ इंडिया) आयोजित केला होता. महापुरुषांचा सन्मान, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्रवासियांचा स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी आपल्या राज्यात महाराष्ट्रद्रोह्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी हा हल्लाबोल मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र प्रेमी आले त्या सर्वांचे अजित पवार यांनी मनापासून स्वागात केले.
अजित पवार म्हणाले, “गेले सहा महिने राज्यात जे सरकार सत्तेत आले, त्यामुळे दुर्दैवाने राज्याच्या मातीला फुटीचा, गद्दारीचे संकट जेव्हा महाराष्ट्रावर येते. तेव्हा राज्याचा स्वाभिमान आणि अस्मितेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठतो आणि आपले ध्येय साध्य केल्याशिवाय राज्य शांत बसत नाही याची साक्ष देणारा हा मोर्चा असल्याचे अजित पवार म्हणाले. खरतर ही वेळ राज्यावर का आली तर महापुरुषांविषयी अपमानास्पद वक्तव्य सातत्याने होत आहेत. त्याला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढावा लागला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, मौलाना आझाद अशा अनेक महापुरूषांची नावांची यादी आहे ज्यांच्याबद्दल गरळ ओकण्याचे काम, बेताल वक्तव्य करण्याचे काम कशामुळे सुरू आहे, यामागील मास्टमाईंड कोण आहे, हे का थांबत नाही”, असे अनेक सवाल त्यांनी राज्य सरकारला केले.
पुढे अजित पवार म्हणाले की, माणसाकडून चूक एकदा होऊ शकते, चूक झाल्यास माफी मागतो ही राज्याची संस्कृती आहे. परंतु सत्ताधाऱ्यांमध्ये तसे घडत नाही. राज्यपाल काही बोलले की त्यांच्यापुढे त्यांचे मंत्री बेताल वक्तव्य करतात, अशा लोकांना जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी, असे शब्दात अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त केला. तुम्ही राज्यकर्ते म्हणून बसले असताना संविधान, कायदा काय सांगतो हे पाहणे जरूरीचे असताना या सगळ्याचा विसर राज्यकर्त्यांना पडला आहे, असा आरोप त्यांनी केला. या सर्व विरोधात जितक्या मोठ्या संख्येने राज्यातील जनसमुदाय इथे अवतरला आहे. त्यातून राज्यकर्त्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.
तसेच यावेळी महापुरुषांचा होणार अपमान पाहाता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना हटवले पाहिजे, या सोबत जे आमदार दोषी असतील त्यांनाही हटवले पाहिजे अशी मागणी अजित पवारांनी केले. ही सर्व प्रवृत्तीची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी उद्याच्या अधिवेशनात वेळ पडल्यास कडक कायदा करावा अशी मागणी त्यांनी केली. अशाप्रकारच्या बिलाला आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील असेही ते म्हणाले.
बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभागातील ८६५ मराठी गावे राज्यात आणण्याचा संघर्ष सुरू असताना राज्यातील गाव कर्नाटकात जाण्यास का सुरुवात झाली याचा राज्यातील नागरिकांनी विचार करायला हवा. आम्ही सत्तेत असताना अशा पद्धतीने कधीही भूमिका सीमाभागातील गावांनी घेतली नाही. देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र पूर्णपणे वेगळा आहे त्यामुळे हे का घडले आणि कुणामुळे घडले याची स्पष्टता व्हायला हवी असे ते म्हणाले.
शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटक बँकेत सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची भूमिका घेतात यावर अजित पवारांनी राज्य सरकारला धारेवर धरले. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राबद्दल अनेक वक्तव्य केली त्यावर राज्य सरकारला काही वाटायला हवे, कर्नाटक सरकार सातत्याने आपल्यावर अन्याय करतेय. तुमचे पुतण्या मावशीचे प्रेम हे सगळ्यांना कळाले आहे, अशी टीका अजित पवारांनी  केली. आपल्याला इथेच थांबून चालणार नाही तर या सत्ताधाऱ्यांकडून सतत होणाऱ्या चुकीच्या निर्णयातून या सरकारला त्यांची जागा दाखवण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असे आवाहन अजित पवारांनी सर्व उपस्थितांना केले.
Exit mobile version