मुंबई | “बेळगावच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गुवाहाटीला का जात नाहीत? बेळगाव महाराष्ट्रात यावे, यासाठी नवस का केला जात नाही?’, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थित आज (3 डिसेंबर) बंजारा समाजाचे नेते अनिल राठोड यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून (Maharashtra-Karnataka border issue) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि गुवाहाटीच्या दौऱ्यावरून त्यांनी हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमावादाच्या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. तरआमचे मुख्यमंत्री गुवाहाटीवरून आल्यानंतर शांत का? बेळगावच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री गुवाहाटीला का जात नाहीत?, बेळगाव महाराष्ट्रात यावे, यासाठी नवस का केला जात नाही? सर्व मंत्री आणि आमदारांना घेऊन जा, तर बेळगाव महाराष्ट्रात आलेच पाहिजे”, असा सवाल उपस्थित करत त्यांच्यावर टीका केली.
“प्रत्येक राज्यात इतर राज्यांचे भवन असतात. परंतु, आपले आणि कर्नाटकचे नाते काय आहे. हे कदाचित राज्यातील मुख्यमंत्र्यांकडून ऐकायला आलेले नाही. महाराष्ट्रातमध्ये कर्नाटक सरकार ‘कर्नाटक भवन’ असतील तर आजच मी वृत्तपत्रात वाचले की, महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकात येण्यात मज्जाव केला असून यासंदर्भात मुख्यमंत्री एकही शब्द बोललेले नाही”, सीमावादावरून ठाकरेंनी सरकारला खडेबोल सुनावले.