HW News Marathi
महाराष्ट्र

रश्मी शुक्ला यांच्यावर बिल्डरांकडून खंडणी घेत असल्याचे ‘या’ नेत्याचे गंभीर आरोप

मुंबई | सध्या फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी गंभीर आरोप केले आहेत. रश्मी शुक्ला या पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना खंडणी गोळा करायच्या, असे त्यांनी म्हटले आहे. पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांच्यामार्फत हा सारा कारभार सुरु होता. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर पडदा टाकला, असे हरिभाऊ राठोड यांनी म्हटले आहे. ते आज (२६ मार्च) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर बिल्डरांकडून खंडणी घेत असल्याचे आरोप केले. पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ पोलिसांनी प्रॉपर्टी सेलमध्ये बोलावून धमकावत असत. ते रश्मी शुक्ला यांच्या नावाने पैसे मागायचे, असे हरिभाऊ राठोड यांनी म्हटले आहे.

मात्र, रश्मी शुक्ला यांना देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ होते. संदीप जाधव यांनी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात खंडणीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर केवळ धनंजय धुमाळला निलंबित करण्यात आल्याचे दाखवण्यात आले. पण प्रत्यक्षात त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण रफादफा केले. आता मी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचेही हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.

‘भाजपसोबत जाण्यासाठी रश्मी शुक्लांनी माझ्यावर दबाव आणला’

सध्या राज्यात गाजत असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यासंदर्भातील अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला असून त्यामध्ये रश्मी शुक्ला यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही रश्मी शुक्ला यांनी आपल्यावर दबाव आणल्याची कबुली दिली आहे.

“मी ही गोष्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या कानावर घातली होती. त्या काळामध्ये मी भाजपसोबत यावे, यासाठी शुक्ला मला भेटल्या होत्या. मात्र, मला शिरोळ तालुक्यातील जनतेने निवडून दिले आहे. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही, असे मी शुक्ला यांना सांगितले. त्यानुसार मेळावा घेऊन, जनतेची मते आजमावून मी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला”, असे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले आहे.

अहवाल मी नव्हे तर नवाब मलिक यांनी फोडला – फडणवीस

राज्यातील पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल हा मी फोडला नाही. मी या अहवालाचं केवळ कव्हरिंग लेटर वाचलं होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी तो अहवाल प्रसारमाध्यमांना उपलब्ध करुन दिला. आता हेच नेते अहवाल फुटल्यामुळे काही अधिकाऱ्यांना मानसिक त्रास होत असल्याचे म्हणत आहेत. पण मी कव्हरिंग लेटर वगळता उर्वरित अहवाल लिफाफाबंद करुन केंद्रीय गृहसचिवांना सादर केला होता. याउलट नवाब मलिक यांनी या अहवालाची काही पाने प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे तो अहवाल नवाब मलिक यांनीच फोडला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच या अहवालात नमूद करण्यात आल्याप्रमाणेच पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. तत्कालीन पोलीस महासंचालकांनी याप्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, असे सुचविले होते. मात्र, ही चौकशी कोणाच्या आदेशाने थांबवण्यात आली, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले नवाब मलिक?

रश्मी शुक्ला या अनधिकृत फोन टॅप करत होत्या म्हणूनच त्यांना वेगळ्या प्रकारची शिक्षा देऊन बदलण्यात आले. महाविकास आघाडी सरकार बनत असताना सर्वात महत्त्वाचे जे नेते होते त्यांचे फोनसुद्धा टॅप करण्याचे उद्योग रश्मी शुक्ला यांनी केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.आमदार फोडता येत नाही म्हणून आता अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे स्वतः करत आहेत, असा आरोप करतानाच फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आल्याचे मलिक म्हणाले. राज्यपाल,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांची हालचाल, पोलीस रेकॉर्ड फडणवीस यांनी सादर केले. ते सादर करत असताना ही हालचाल होती की नाही हे मला माहिती नाही, असे सांगून फडणवीस जाणीवपूर्वक भ्रम निर्माण करत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे.

रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगची अतिशय वाईट सवय ! – जितेंद्र आव्हाड

फोन टॅपिंग प्रकरणी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “फोन टॅपिंग करणं हा मोठा गुन्हा आहे. तसेच कोणाचाही फोन टॅप करायचा असेल तर त्याला गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची परवानगी आवश्यक असते. रश्मी शुक्ला यांनी अशा प्रकारची परवानगी गेतली होती का? सिताराम कुंटे यांनी या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे दिले आहे. रश्मी शुक्ला यांनी परवानगी एकाच्या नावाने घेतली आणि फोन टॅपिंग दुसऱ्या लोकांचे केलेत. रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगची अतिशय वाईट सवय होती. हे आधीच्या सरकारापासून सुरु होते. त्यांचे याबाबतच एक पत्रही उघडकीला आले. त्यानंतर त्यांनी आपली चूकही कबूल केली होती”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोव्हिड काळात मुख्यमंत्र्यांकडून योग्य पद्धतीने नियोजन!”, एकनाथ शिंदेंचं सीटी रवींना प्रत्युत्तर

News Desk

पेट्रोल पंप तपासणी मोहीम सुरु

News Desk

नागरी पाणी पुरवठा योजनांसाठीच्या थकीत कर्जाची एकरकमी परतफेड

News Desk