HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर नेत्यांनी घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय 

मुंबई | राज्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर सोमवारपासून काही दिवस बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२१ फेब्रुवारी) केली आहे. उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला होता. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक नियमांचं पालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी यावेळी राजकीय पक्षांनीही गर्दी करणारी आंदोलनं, मोर्च काढू नयेत. माझ्यासह महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांनाही पक्ष वाढवायचा आहे. पण हे करताना करोना संसर्ग वाढणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन केलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी ट्विट करत आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करत असल्याची माहिती दिली आहे. ते म्हणालेत की, “करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसंच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत”.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांचे सर्व दौरे रद्द केले आहेत. नागरिकांची गर्दी होऊ नये आणि कोरोना नियमांचं पालन केलं जावं यासाठी त्यांनी हे दौरे रद्द केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच आज सकाळी त्यांनी नागरिकांच्या भेटी घेणंही टाळलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर पवार यांनी हा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सुप्रिया सुळेंचंही लोकांना आवाहन

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही उद्यापासूनचे म्हणजे 23 फेब्रुवारीपासूनचे पुढचे सर्व दौरे रद्द करण्यात येत असल्याचं ट्विटरवरून स्पष्ट केलं आहे. सर्वांच्या आरोग्याचा विचार करता हा निर्णय आवश्यक देखील आहे. हे लक्षात घेता, 22 फेब्रुवारी ते 7 मार्चपासूनचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम व दौरे पुढे ढकलण्यात आले आहेत, याची कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती. माझे सर्वांना आवाहन आहे की, सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरा, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं तंतोतंत पालन करा. शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

जयंत पाटील यांचा हिंगोली दौरा रद्द

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांनी उद्या होणारा त्यांचा हिंगोली दौरा रद्द केला आहे. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचं आयोजन केलं आहे. त्यानिमित्ताने ते हिंगोलीला येणार होते. परंतु कोरोनाची लागण झाल्याने त्यांनी हा दौरा रद्द केला आहे, अशी माहिती हिंगोलीचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी दिली आहे.

उदय सामंत यांचा वरळीतील कार्यक्रम रद्द

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आजचा वरळी येथील कार्यक्रम रद्द केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज २२ फेब्रुवारी २०२१ रोजी होणारा उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ वरळी, मुंबई हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास हा कार्यक्रम घेतला जाईल. तसेच तुमच्या सर्व अडचणी अर्ज रुपाने कार्यालयातील ड्रॉप बॉक्समध्ये द्यावेत किंवा तुम्हाला काही अडचणी आल्यास माझ्या मंत्रालयात संपर्क साधावे, असं आवाहन सामंत यांनी केलं आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात काल ८,३६९ नवे रुग्ण आढळले, तर २४६ जणांचा झाला मृत्यू

News Desk

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करावी !

News Desk

देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ६,५६६ नवे रुग्ण, तर १९४ करोनाबाधितांचा मृत्यू

News Desk