HW News Marathi
देश / विदेश

‘अमरावतीतल्या हवाई सुंदरी श्वेता शंकेची धाडसी कामगिरी’, सर्वत्र कौतुकाचा वर्षांव!

मुंबई। एकीकडे भारतात ७५ वा स्वातंत्रदिन साजरा केला जात होता, त्याच वेळेस दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये मोठा संघर्ष सुरू होता. तालिबानने १५ ऑगस्टला अफगाणिस्तानची राजधानी काबुलला चहूबाजूंनी वेढले. अफगाणिस्तानमधले अनेक प्रांत तालिबानच्या ताब्यात गेले. यामुळे अफगाणिस्तानमध्ये असलेल्या अनेक देशांच्या नागरिकांची सुखरुप सुटका करण्यासाठी त्या त्या देशांची विमाने काबुलच्या दिशेने उड्डाण केली. भारताने देखील १५ ऑगस्ट रोजी काबुलहून १२९ भारतीयांना सुरक्षित घेऊन एअर इंडियाचे विमान ए आय 244 दिल्लीत दाखल झाले होते. या एअर इंडियाच्या विमानात एका मराठमोळ्या तरुणीने मोठी कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं.

जीवाची पर्वा न करता भारतीयांची सुटका केली

अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या १२९ भारतीय व इतर प्रवाश्यांना घेऊन एअर इंडियाच विमान भारतात दाखल झालं एआय- २४४ या विमानाने काबुल विमानतळातून बिकट परिस्थिती असताना उड्डाण घेतले. या एअर इंडियाच्या विमानात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील श्वेता शंके ही हवाई सुंदरी या मिशनमध्ये सहभागी होती. तिने समर्थपणे संपूर्ण परिस्थिती हाताळत जीवाची पर्वा न करता भारतीयांची सुटका करत व त्यांना मार्गदर्शन करत आपल्या मायदेशी आणले. त्यांच्या धाडसामुळं १२९ नागरिक सुखरूप घरी परतले आहेत.

विमानाला लँडिंग करु दिलं जात नव्हतं

श्वेता शंकेच्या या कामगिरीचं आणि धाडसाचं मात्र आता संपूर्ण देशभरातून कौतुक केलं जात आहे. तिच्या आई वडिलांना श्वेताचा अभिमान वाटतोय. अफगाणिस्तानमध्ये एअर इंडियाचं विमान पोहोचल्यावर विमानाला लँडिंग करु दिलं जात नव्हतं. मात्र काही वेळानंतर हे विमान काबूलच्या एअरपोर्टवर उतरलं आणि भारतीयांना सुखरुप परत देखील घेऊन आलं. एअर इंडिया विमानात कामगिरी करणाऱ्या श्वेता शंके सोबतच सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. यामध्ये महाराष्ट्राची लेक श्वेताचा देखील समावेश आहे. श्वेताच्या आई-वडिलांना याचा सार्थ अभिमान देखील वाटतोय.

विमानातील क्रू मेम्बर्सनाही सांगितले गेले नव्हते

काबूल विमानतळावर प्रसंग अंगावर शहारे आणणारा होता. अस श्वेताने एका वृत्तपत्राला माहिती देतांना हे म्हटलंय, ”जवळजवळ चार तास आम्ही काबूल विमानतळावर होतो. आपल्याच देशातून जीव वाचविण्यासाठी बाहेर पडण्यासाठी सुरू असलेली अफगाणी नागरिकांची धडपड पाहून तेथील भयंकर परिस्थितीची जाणीव आम्हाला होत होती. एकदाचे तीन तास ४८ मिनिटांनी आमच्या विमानाने उड्डाण केले. तरीही जीव थाऱ्यावर नव्हताच.उ त्यानंतर मात्र रविवारी रात्री साडेआड वाजता आमचे विमान दिल्लीत उतरले आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.”श्वेता सांगत होती, एअर इंडियाचे ए आय 244 हे विमान दिल्ली येथून काबूलला जाण्यासाठी सज्ज होते. मात्र, ही फ्लाईट नेहमीसारखी नव्हती. कारण अवघ्या २४ तासांमध्ये काबूल तालिबान्यांच्या हाती पडले. तेथे नेमके काय घडत आहे हे विमानातील क्रू मेम्बर्सनाही सांगितले गेले नव्हते.

काबूलमधील स्थिती माहीत असल्याने विमानात जास्तीचे इंधन भरले होते

आम्हाला तेथे काय घडत आहे, याची माहिती होती, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी आम्ही ठेवली होती. कारण तुम्हाला सिद्ध होण्यासाठी असे प्रसंग वारंवार येत नाहीत. आम्ही सर्व तयारीनीशी तेथे गेलो होतो. प्रवाशांचे जेवणही सोबत घेतले होते.श्वेता पुढे म्हणाली, दिल्ली येथील इंदिरा गांधी विमानतळावरून रविवारी दुपारी १२.४५ ला लाहोरमार्गे काबूलकडे उड्डाण केले. १ वाजून ४५ मिनिटांनी आम्ही काबूलच्या आकाशात पोहचलो. पण लँडिंगची परवानगी मिळत नव्हती. कारण विमानतळावर प्रचंड गोंधळ होता . तालिबानी काबूलमध्ये घुसल्याने एअर ट्रॅफिक कंट्रोलर कर्मचारी पळून गेले होते. आमचे विमान तालिबान्यांच्या नजरेत येऊ नये म्हणून पायलटने रडार बंद केले. आमच्या मनातही धाकधूक सुरू होती. कारण तब्बल १ तास आम्ही १६ हजार फूट उंचीवर घिरट्या मारत होतो. परंतु , काबूलमधील स्थिती माहीत असल्याने विमानात जास्तीचे इंधन भरले होते. बाहेर वाराही वेगाने वाहत असल्याने विमान हेलकावे खात होते.

प्रवाशांना सुखरूप परत आणणे हेच आमचे एकमेव ध्येय होते

अखेर परवानगी मिळाली व दुपारी २ वाजून ३२ मिनिटांनी आमचे विमान खाली उतरले. विमानतळ नेमकेग कुणाच्या ताब्यात आहे याचा अंदाज नव्हता. जिवाला धोका असल्याने कुणालाही विमानाच्या बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. सर्वत्र, सायरन, गोळीबार, नागरिकांचे ओरडणे असा कोलाहल सुरू होता. अमेरिकन सी-१७ ग्लोबमास्टर आणि हेलिकॅाप्टर्स यांच्या आवाजाने जणू लढाईच पेटली असे वाटत होते. सर्वत्र धुराचे साम्राज्य होते. विमानातील७ प्रवाशांना सुखरूप परत आणणे हेच आमचे एकमेव ध्येय होते. दिल्ली तेज काबूल हे अंतर १.०५ ते १.२० मिनिटांचे आहे. ६ वाजून २० मिनिटांनी काबूल सोडले. रात्री साडेआड वाजता विमान दिल्ली विमानतळावर लॅंड झाले आणि सर्वांची काबुल मधून सुटका झाली होती.

त्यावेळी फायरिंगचे आवाज येत होते

अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी श्वेता शंके हिच्याशी संपर्क साधून तिची विचारपूस केली. तिला कुठलीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क साधावा, असा धीर दिला. ‘काबूल येथील परिस्थिती अतिशय गंभीर असून जेव्हा इंडियन एअरलाइन्स विमान लँड झालं त्यावेळी फायरिंगचे आवाज येत असल्याचे श्वेता हिने सांगितले, श्वेता अजूनही एअर क्राफ्टवर असल्याचं तिने पालकमंत्र्यांना सांगितलं. आणि अमरावतीत आल्यावर भेटायला येते असं सांगून हा संवाद इथेच संपला. संपूर्ण महाराष्ट्राला गर्व वाटावा, अशी कामगिरी महाराष्ट्राच्या निरजाने केलीय… तिच्या कर्तृत्वाला सॅल्युट!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ब्रिटनच्या राजपुत्र प्रिन्स हॅरीचा शाही विवाह सोहळा

News Desk

#PulwamaAttack : श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून ५१ लाखांची मदत जाहीर

News Desk

कृषी कायद्यांना दीड वर्ष स्थगिती देण्याचा केंद्राचा प्रस्ताव

News Desk