HW News Marathi
महाराष्ट्र

घरगुती ग्राहक आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोपर्यंत तोडणार नाही, अजित पवारांची मोठी घोषणा

मुंबई | वीज कनेक्शन तोडण्याच्या मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. जोपर्यंत चर्चेतून मार्ग निघत नाही तोपर्यंत राज्यातील घरगुती ग्राहक आणि शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी आज विधानसभेत केली आहे. त्यामुळे राज्यातील हजारो वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना काळात पाठवण्यात आलेल्या वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरून सभागृहात आज (२ मार्च) गोंधळ उडाला. विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावरून भाजपा आक्रमक झाली.

सभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत वीज तोडणी मोहिमेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचे आभार मानले.सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजप आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं होतं. वाढीव बिलासंदर्भातील फलक झळकावत भाजपानं या मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधून घेतलं. सर्वसामान्य नागरिकांच्या वीज कनेक्शनसह कृषी पंपाची वीज तोडण्याची कारवाई थांबवण्यात यावी, अशी मागणी भाजपानं केली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव वीज बिलाचा मुद्दा उपस्थित केला.

वाढीव वीज बिल मुद्द्यांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत चर्चा घेण्याची मागणी केली. “राज्यात वीज कनेक्शन कापली जात आहेत. करोनामुळे संकटात आलेल्या नागरिकांना अडचणीत आणलं जात आहे,” असं फडणवीस म्हणाले. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले,”राज्य सरकारच्या वतीने मी सांगू इच्छितो की, जोपर्यंत ऊर्जा विभागाची वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य नागरिकांचे वीज कनेक्शन तोडणं थांबण्यात येईल. आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यात यावी, अशी सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांची इच्छा आहे. त्यामुळे एक दिवस ठरवून चर्चा करू. चर्चेतून सगळ्या सदस्यांचं समाधान झाल्यानंतर वीज बिलाच्या मुद्द्यासंबंधातील निर्णय घेण्यात येतील,” असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परमबीर सिंग यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी खोटा आरोप केला, अनिल देशमुखांचे ट्विट

News Desk

आमदारांचे ऐतिहासिक फोटोसेशन ‘हा’ नेता मात्र गैरहजर

News Desk

देश हादरवण्याचा कट, सातवी कारवाई, जोगेश्वरीतून आणखी एकाला उचलला!

News Desk