HW News Marathi
महाराष्ट्र

“मुंबईतील अवैध बांधकामांबाबत BMC काय कारवाई करतेय?”, हायकोर्टाने केला सवाल

मुंबई | मुंबईत गेले २ दिवस जोरदार पाऊस सुरु आहे. अशात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे मालाडच्या न्यू कलेक्टर कपाऊंड येथील रहिवासी इमारत ढासळली. यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची मुंबईउच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत स्यू मोटो याचिका दाखल करून घेतली आहे. तसेच मुंबईतील अवैध बांधकामांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महानगरपालिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मालाडमधील रहिवासी इमारत कोसळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने स्यू मोटो याचिका दाखल करून घेत त्यावर शुक्रवारी सुनावणी घेतली. यावेळी या प्रकरणाची आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून २४ जूनपर्यंत या चौकशीचा प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनाही फटकारले आहे.

मुंबईतील अवैध बांधकामांबाबत मुंबई महानगरपालिका काय कारवाई करतेय, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने यावेळी विचारला. तसेच अशा प्रकारच्या बेकायदा बांधकामांसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा. जर आवश्यकता भासली, तर फौजदारी स्वरुपाची कारवाई करा, असे निर्देश देत मुंबई महानगरपालिकेला चांगलेच सुनावले आहे. बेकायदा बांधकामं कशी होतात, त्याची सविस्तर माहिती लेखी स्वरुपात द्यावी. अशी बांधकामे इतका काळ कशी काय उभी राहतात आणि पालिकेच्या नगरसेवकांनी हा मुद्दा पुढे का आणला नाही? यासंदर्भात माहिती सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

किशोरी पेडणेकर यांनी न्यायालयाचे आदेश असल्याने अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई थांबली असल्याचे म्हटले होते. यावर न्यायालयाने संताप व्यक्त केला असून, स्वतःच्या चुकांसाठी न्यायालयाला जबाबदार धरू नका. मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत आपला आदेश नव्हता. जर्जर इमारती रिकाम्या करण्यासाठी परवानगी घेण्याची मुभा दिलेली होती, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले आहे.

काय आहे प्रकरण?

दरम्यान, मालाड येथील मालवणी परिसरात अब्दुल हमीद रोडवर बुधवारी रात्री ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या त्यानंतर शोधकार्याला सुरूवात झाली. ढिगाऱ्याखालून काढण्यात आलेल्या जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तौक्ते वादळात इमारतीला तडा गेला होता. त्यानंतर चुकीच्या पद्धतीने बांधकाम केल्याची माहिती नांगरे पाटील यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान उद्या पुण्याला भेट देणार; पुणे मेट्रो प्रकल्पाचे करणार उद्घाटन

News Desk

#Coronavirus : राज्यातील सिनेमागृहे, नाट्यगृहे बंद ठेवण्याच्या आदेशाला थिएटरचालकांनी धुडकावले

swarit

नांदेड जिल्ह्यातील पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडीची आघाडी

swarit