मुंबई | महाविकास आघाडी सरकारने या ‘टीआरपी’ घोटाळ्याची चौकशी केली नसती तर या देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
टीआरपी घोटाळयानंतर एक तथाकथित पत्रकाराचे संभाषण समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रसारमाध्यमांना लोकशाही व्यवस्थेचा चौथा स्तंभ मानण्यात आलं आहे. मात्र प्रसारमाध्यमांतील एक तथाकथित पत्रकार व्यक्ती देशाच्या पंतप्रधानांचे कार्यालय व प्रमुख मंत्रालयांना अक्षरशः खेळण्याप्रमाणे वापरून घेत आहे, हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या माहितीवरून समजते असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
सदर व्यक्तीला देशातील सैनिकांचे बलिदान एक ‘विजयाचा’ क्षण वाटतो आहे.प्रसिद्ध झालेली ही सर्व माहिती वाचल्यावर खरे देशद्रोही कोण आहेत हे जनतेला कळेल.सदर इसम अत्यंत बिनधास्तपणे न्यायाधीशांना विकत घेण्याच्या गप्पा मारताना अत्यंत स्पष्टपणे दिसत आहे, न्यायालयाचा खऱ्या अर्थाने अवमान आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.
अनेक गोपनीय बातम्या देशाच्या संसदेला आणि अगदी देशाच्या मंत्रीमंडळाला अवगत होण्यापूर्वीच या व्यक्तीला माहिती होत्या असेही जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.