HW News Marathi
महाराष्ट्र

“कायम आपलं कौतुक होईल अशी अपेक्षा बाळगू नका”, आव्हाडांनी केली राऊतांची पाठराखण

मुंबई | अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या रोखठोक या सदरातून केली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले.

असा रोखठोक फटका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मारला होता. त्यावरुन अजित पवार यांनी राऊतांना इशारा दिला होता. मात्र, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेद्र आव्हाड यांनी राऊत यांची पाठराखण केली आहे. दरम्यान, गृहमंत्र अनिल देशमुख यांना यावर प्रश्न विचारला असता त्यांनी मात्र थेट उत्तर देणे टाळले होते.

आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटले की ”कान उघाडणी करणे, कौतुक करणे केलेल्या कामाची स्तुती करणे, कधीतरी टिका करणे. हे स्तंभ लेखकांच व पत्रकारांच कामच आहे. त्याच्यातून शिकायलाही मिळत आणि पुढची पावल कशी टाकायची हे समजूनही घेता येते. फक्त आपले कायम कौतुकच होईल, अशी अपेक्षा कोणीच बाळगू नये.”

 

अजित पवार काय म्हणाले होते?

राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणीही मिठाचा खडा टाकण्याचे काम करु नये. अनिल देशमुख यांना अपघाताने गृहमंत्रीपद दिल्याचे विधान संजय राऊत यांनी केल्यानंतर आज बारामतीत अजित पवार यांना पत्रकारांनी या बाबत विचारणा केल्यानंतर पवार यांनी रोखठोक शैलीत राऊत यांना इशारा दिला.

कॉंग्रेसमध्ये सोनिया गांधी यांना, शिवसेनेत उध्दव ठाकरे यांना तर राष्ट्रवादीत शरद पवार यांना कोणाला मंत्री करायचे याचा अधिकार आहे. त्या मुळे ते या बाबतचा निर्णय घेत असतात. महाविकास आघाडीबद्दल त्रयस्थाने वक्तव्य करणे समजू शकतो, पण घटक असलेल्यांनी अशी विधाने करणे योग्य नाही, अशा शब्दात पवार यांनी या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

काय म्हणाले होते संजय राऊत?

देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा आणि रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो, असे संजय राऊत यांनी ‘सामना’तील रोखठोक या सदरात नमूद केले होते.

अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल, असा टोलाही राऊतांनी अनिल देशमुख यांना लगावला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकारणात परस्पर विरोधी असणारे मुंडे बहीण भाऊ लातूरमध्ये आले एकत्र!

Aprna

कीर्तनकार बंडातात्या कराडकरांनी वाईन धोरणाविरोधात बोलताना ‘या’ महिला नेत्यांवर केले आक्षेपार्ह वक्तव्य

Aprna

सवलतींसाठी चिखली पं.स.मध्ये कर्मचारी झाले दिव्यांग ?

News Desk