HW News Marathi
Covid-19

रुग्णसेवेचं अखंड व्रत घेवून अहोरात्र सेवा देणाऱ्या कोरोना योध्यांच्या रूपातील डॉक्टरांना राजेश टोपे यांचे पत्र

मुंबई | आज १ जुलै राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि महान डॉक्टर विधान चंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ भारतात हा दिवस‘राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस’ साजरा केला जातो. कोरोना काळात रुग्णांवर उपचार करुन त्यांना शारीरिक आणि मानसिक बळ देण्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका डॉक्टर बजावत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्टर अथक प्रयत्न करत आहेत. याच राज्यातील तमाम डॉक्टरांना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्र लिहिले आहे.

काय लिहिले आहे पत्रात…

प्रिय डॉक्टर्स

“आज तुमचा दिवस.. डॉक्टर्स डे.. त्यानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा! तसा तुमचा कुठला असा एक दिवस असू नये. कारण देवाचा कुठला असा एक दिवस असतो का? तो दररोज आपल्यात हवा असतो. कोरोनाच्या संकटाने राज्याला विळखा घातला. त्या विळख्यातून नागरिकांना सोडवण्यासाठी तुम्ही जीवाची बाजी लावत आहात. आज सगळीकडे धार्मिक स्थळं बंद असताना त्यातील देव कुठे असेल तर तुमच्या रुपाने तो सगळ्यांना दिसतोय, अशी सार्वत्रिक भावना आहे. हजारो रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत ते तुमच्या प्रयत्नामुळे. म्हणूनच तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.”

“गेल्या जवळपास साडेतीन महिन्यांपासून तुम्ही-आम्ही सर्वच कोरोनाला हरवण्याच्या ध्येयाने लढतोय. डॉक्टर, तुमच्या साथीला आरोग्य कर्मचारी आहेत, पोलिस आहेत, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही आहेत. आपल्या सर्वांच्या या प्रयत्नामुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळत आहेत. नागरिक काळजी घेताना दिसताहेत. त्याची तीव्रता वाढत नाहीये.”

“डॉक्टर, आपली जबाबदारी मोठी आहे. कोरोना झाला या कल्पनेने हादरुन गेलेल्या रुग्णांना उपचार देऊन त्यांच्या मनाला उभारी देऊन त्याना पुन्हा एकदा पूर्ववत करण्याचं काम आपण करत आहात. समोरच्याला कोरोना तर झाला नसेल या संशयानेच माणसांमध्ये काहीशी दरी निर्माण होऊ पाहतेय. मात्र डॉक्टर आपण, कोरोना रुग्णांच्या संपर्कात राहून त्यांच्या पाठीवर मायेचा हात देऊन त्यांना केवळ उपचारातूनच बरे करत नाही, तर मानसिक पाठबळ देऊन नव्याने उभंही करत आहात, आपल्या हातून घडणाऱ्या या मानवसेवेचं मोल कशातही मोजता येणार नाही.”

“तुम्ही कोविड योद्धे बनून आघाडीवर राहून कोरोनाशी अथकपणे, अविरत दोन हात करताय. आज राज्यात दीड लाख कोरोनाबाधितांपैकी जवळपास 90 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करुन केलेल्या या अथक परिश्रमाचेच हे फळ आहे. या संकट काळात आपल्या कुटुंबातील सदस्यांना घरी सोडून येताना आपली मानसिक स्थिती काय होत असेल याची कल्पना आहे, तरीही कर्तव्य भावनेपोटी आपण कोरोनाशी लढायला दररोज घराबाहेर पडतात.आम्ही तुम्ही काळजी घेऊ मात्र तुम्ही घरीच सुरक्षित थांबा, असा प्रेमळ दिलासाही सामान्य नागरिकांना आपण देता, डॉक्टर, तुम्हाला आणि तुमच्या कार्याला सलाम.” असे भावनिक आणि आभार व्यक्त करणारे पत्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लिहिले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार!

News Desk

अरुण गवळींची मुलगी लॉकडाऊनमध्ये अडकणार लग्नाच्या बंधनात

News Desk

देशात मृतांचा आकडा घटला, कोरोनामुक्तांची संख्या बाधितांपेक्षा जास्तच!

News Desk