HW News Marathi
मुंबई

जनतेची दिशाभूल केल्याबद्दल सरकारने माफी मागावीः विखे पाटील

शेततळ्यासाठी निधी काँग्रेस आघाडी सरकारचा, जाहिरातबाजी युती सरकारची!

मुंबई राज्यसरकारच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ‘मी लाभार्थी’ असे घोषवाक्य देऊन जाहिरात करण्यात आलेल्या शेततळ्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारने जुलै २०१४ मध्ये निधी दिला होता. याशिवाय संबंधित शेतकऱ्याने कर्ज काढून शेततळ्याचा उर्वरित खर्च भागवला होता. तरीही हे शेततळे आपल्यामुळेच झाल्याची जाहिरात करून भाजप-शिवसेना सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. त्यासाठी सरकारने लोकांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

शेततळ्याच्या या जाहिरातीमागील वस्तुस्थिती समोर आल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त राज्य सरकारने सुरू केलेल्या जाहिराती फसव्या, वस्तुस्थितीशी विसंगत आणि अतिशयोक्ती करणाऱ्या आहेत. शेततळे योजनेसंदर्भात प्रकाशित झालेल्या जाहिरातीवरून हा प्रकार सिद्ध झाला आहे. पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील भिरावी येथील शेतकरी शांताराम कटके यांना काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात जुलै २०१४ मध्ये शेततळ्यासाठी १ लाख ७९ हजार रूपये मंजूर झाले होते. त्यानंतर लगेच पावसाळा सुरू झाला व पावसाळ्यात शेततळ्याची उभारणी शक्य नसल्याने त्याचे काम काही महिन्यानंतर पूर्ण झाले. शिवाय या शेततळ्यासाठी लागलेली एकूण रक्कम मंजूर निधीपेक्षा किती तरी अधिक होती. त्यामुळे शांताराम कटके यांनी कर्जही घेतले होते. कटके यांनी अत्यंत परिश्रमाने उभारलेल्या शेततळ्याची खोटी जाहिरात करून त्याचे संपूर्ण श्रेय लाटण्याचा अश्लाघ्य प्रकार राज्य सरकारने केला आहे.

मुळातच तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त भाजप-शिवसेनेचे सरकार आपल्या कामांची नव्हे तर काँग्रेस आघाडी सरकारच्याच काळातील योजनांची आणि निर्णयांची जाहिरात करते आहे. या सरकारकडे लोकांना सांगण्यासाठी स्वतःची अशी कोणतीही विशेष कामगिरी नाही. नावे बदलून किंवा किरकोळ बदल करून काँग्रेस आघाडी सरकारमधील ज्या योजनांची कशीबशी अंमलबजावणी सुरू आहे, त्याच योजनांचा आज भाजप-शिवसेना गाजावाजा करीत असल्याचा ठपकाही विखे पाटील यांनी ठेवला आहे.

जनतेने अत्यंत विश्वासाने सरकार निवडून दिलेले असते. परंतु, असे सरकार केवळ स्वकौतुकासाठी लोकांना असत्य, अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती देत असेल तर ही जनतेशी केलेली प्रतारणा आहे. अशा सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार असू शकत नाही. अत्यंत गंभीर प्रकरणे घडल्यानंतरही भाजप-शिवसेना सरकारने राजीनामा देण्याची नैतिकता दाखवलेली नाही. त्यामुळे जनतेचा विश्वासघात केल्याबद्दल या सरकारचा राजीनामा मागणे निरर्थक आहे. परंतु, थोडी जरी चाड शिल्लक असेल तर खोट्या जाहिराती प्रकाशित केल्याबद्दल सरकारने जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेअर निर्देशांकांची विक्रमी झेप

News Desk

पनवेल ग्रामीण डॉक्टर वेल्फेअरच्या वतीने केरळ पुरग्रस्तांना मदत

News Desk

पुण्यात मुख्यमंत्र्यांची पारदर्शी सभा – सोशल मिडीयावर सभेबाबत उलटसुलट चर्चा

News Desk