HW News Marathi
राजकारण

मराठवाड्याच्या सामनाचे रौप्य मोहत्सवी वर्ष

सामनाने कधी किनाऱ्यावर बसून तटस्थतेची भूमिका बजावली नाही. एक निश्चित व ठोस भूमिका घेऊन उसळत्या सागरात उडी मारली. ‘‘लढनेकू तूम और कपडे संभालनेकू हम, पण विजयाचे श्रेय मात्र आम्हालाच’’ हे दळभद्री उद्योग सामनाने केले नाहीत. म्हणूनच सामनादीपस्तंभाप्रमाणे उभा आहे. मग तो सामनामुंबईचा असेल, पुण्याचा असेल नाहीतर मराठवाड्याचा. मुंबईचा सामना’ 29 वर्षांचा झाला, पाठोपाठ मराठवाड्याचा सामना’ 25 वर्षांचा झाला. ‘सामनाची ही दमदार वाटचाल अशीच पुढेही सुरूच राहील.

सामनाचे आजचे संपादकीय

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात अनेक वावटळी उठल्या आहेत. लाटांची जागा आता वावटळींनी घेतली आहे. लाटा अनेकदा येतात आणि फेसाप्रमाणे विरून जातात, पण ‘सामना’ची लाट महाराष्ट्रासह देशात उसळली आहे, जनमनावर आरूढ झाली आहे. हा एक चमत्कार आहे, इतिहास आहे. मराठवाड्यातील ‘सामना’च्या लाटेस आज पंचवीस वर्षे झाली. पंचवीस वर्षांचा हा कालखंड म्हणजे धगधगते अग्निकुंड आहे. देशातील जिवंत पत्रकारितेने मराठवाड्याच्या भूमीत पंचवीस वर्षे पूर्ण केली. मुंबईत तीस वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुखांनी टाकलेली ही ठिणगी. मराठवाड्याचा संघर्ष आणि जनतेची वेदना घेऊन याच ठिणगीने मराठवाड्यात नवे पर्व सुरू केले. काळाच्या ओघात अनेक वृत्तपत्रांची पत्रकारिता थंड झाली. लेखण्या मोडून अनेकांनी पत्रकारितेचा फक्त धंदा केला. पानांची रंगीत रद्दी वाढवली, पण विचार, तत्त्वांची वासलात लावली. टिळक-आगरकरांच्या तसबिरी भिंतीवर टांगून त्याच तसबिरीखाली ‘शेठजी’साठी धंदा करणाऱ्या पत्रकारितेचा जोर वाढला असताना ‘सामना’ने आपला स्वतंत्र बाणा कायम जपला. तीच ‘सामना’ची ताकद आहे. जो मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीस पुरून उरला, त्या मराठवाड्याचा स्वाभिमान, अभिमानाचे प्रतीक म्हणून ‘सामना’ मशालीसारखा पेटता राहिला. ‘सामना’ने कधी फायद्या-तोटय़ाची गणिते मांडली नाहीत. सत्तेत कोण आहेत, आमचे कोणी आहेत की विरोधी आहेत याची पर्वा केली नाही. जे पटले नाही, जे देशहिताचे नाही, जे महाराष्ट्राच्या प्रकृतीस मानवणारे नाही, त्या प्रवृत्तीचे धिंडवडे काढणारी ‘सामना’ची

लेखणी कडाडतच

राहिली. देशात आज भाजपचे ‘मोदी’राज सुरू आहे व या राज्यात वृत्तपत्रांची, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी सुरू असल्याची बोंब मारली जात आहे. जणू येथे आणीबाणीसारखीच स्थिती आहे असे जे बोलतात त्यांनी ‘सामना’च्या जिगरबाज पत्रकारितेचा बारकाईने अभ्यास केलाच पाहिजे. सर्व प्रकारची आणीबाणीची परिस्थिती आणि मुस्कटदाबी यांच्या छाताडावर पाय रोवून ‘सामना’ उभा आहे. त्या अर्थाने ‘सामना’ची छाती खरोखरच 56 इंचांची असून फक्त देशालाच नव्हे, तर तिकडे पाकडय़ांनाही ‘सामना’ काय म्हणतोय याची दखल घ्यावीच लागते. ‘सामना’ची ‘ठाकरी’ भाषा, ‘सामना’चे ज्वलंत अग्रलेख हीच आता मराठी पत्रकारितेची ‘राष्ट्रीय’ ओळख बनली आहे. याचा अर्थ ‘सामना’ फक्त राजकारण खेळत बसला असे नाही. राजकीय हंटरबाजी कडाडत असताना, अन्याय-अत्याचार, ढोंगावर हल्ले करीत असताना ‘सामना’ने सामाजिक बांधिलकी जपण्याचा शर्थीने प्रयत्न केला. नव्हे, तो ‘सामना’चा पिंडच बनला. सामाजिक सुधारणा आधी की स्वातंत्र्य आधी? या प्रश्नाची कोडी ‘सामना’ला कधी पडली नाहीत. स्वतःची स्वतंत्र लाट निर्माण करीत सामना हत्तीच्या चालीने आणि वाघाच्या डरकाळीने पुढे चालत राहिला. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरप्रश्नी लोकभावनेला वाचा फोडली ती ‘सामना’नेच. मराठवाड्यातील प्लेगचा कहर असो, भूकंप, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश असो नाहीतर संभाजीनगरातील धर्मांधांचा नंगानाच, ‘सामना’ जनतेसाठी भवानी मातेची तलवार बनून गर्जत राहिला.

अग्रलेखातून बुलंद तोफांप्रमाणे

दणदणाट करीत राहिला. आजही महाराष्ट्राचा बुलंद आवाज बनून दिल्लीश्वरांची झोप कोणी उडवीत असेल तर तो फक्त ‘सामना’च. ‘सामना’ हे जागतिक वृत्तपत्रसृष्टीच्या इतिहासातील एक ज्वलज्जहाल प्रकरण आहे. एक मराठी वर्तमानपत्र ते काय? पण त्याने इतिहास घडवला. लोकांच्या मनावर एवढे मोठे अधिराज्य महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील थोड्याच वृत्तपत्रांनी गाजविले असेल. ‘सामना’ ते भाग्य आजही मनसोक्त उपभोगत आहे. काळाची अनेक आवर्तने येऊन गेली. विषय बदलले, संदर्भ बदलले, आशयात फरक पडला. इतिहासाच्या या प्रचंड घालमेलीत, तुफानी वादळात ‘सामना’ची मशाल पेटती राहिली. कारण ‘सामना’ने कधी किनाऱ्यावर बसून तटस्थतेची भूमिका बजावली नाही. एक निश्चित व ठोस भूमिका घेऊन उसळत्या सागरात उडी मारली. ‘‘लढनेकू तूम और कपडे संभालनेकू हम, पण विजयाचे श्रेय मात्र आम्हालाच’’ हे दळभद्री उद्योग ‘सामना’ने केले नाहीत. म्हणूनच ‘सामना’ दीपस्तंभाप्रमाणे उभा आहे. मग तो ‘सामना’ मुंबईचा असेल, पुण्याचा असेल नाहीतर मराठवाड्याचा. महाराष्ट्राशी पंगा घेणाऱ्यांचे दात घशात घालून शिवरायांचा जयजयकार करण्याचे क्रत आम्ही कायम स्वीकारले. भांडवलशाहीचे पाठबळ नाही, पण दीनदुबळय़ांचा, कष्टकऱ्यांचा पाठिंबा, लोकाश्रय याच भांडवलावर आम्ही देशाच्या दुष्मनांशी व लोकशत्रूंशी सामना करीत राहिलो. मुंबईचा ‘सामना’ 29 वर्षांचा झाला, पाठोपाठ ‘मराठवाड्या’चा सामना 25 वर्षांचा झाला. ‘सामना’ची ही दमदार वाटचाल अशीच पुढेही सुरूच राहील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींना स्किझोफ्रेनिया झालाय का ?, राहुल गांधींचा सवाल

News Desk

माझ्या मनात ईव्हीएमबाबत कोणतीही शंका नाही !

News Desk

तब्बल २३ तासांनी लागला निकाल, भाजपचे डावखरे विजयी

News Desk