HW News Marathi
देश / विदेश

मराठा समाज आज रस्त्यावर उतरला नाही तर वेळ निघून जाईल ! चंद्रकांत पाटलांचा इशारा

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. गेले अनेक दिवस विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये यावरून जुंपत आहे. तर भाजप खासदार संभाजीराजे देखील आक्रमक झाले आहेत. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (२७ मे) एक इशारा दिला आहे. “मराठा आरक्षणासाठी समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. तसेच, “भाजप हा मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला पाठिंबा देईल”, असेही चंद्रकांत पालकांनी पुन्हा जाहीर केले आहे.

चंद्रकांत पाटील यापुढे म्हणाले की, “भाजप राजकीय पक्ष म्हणून आंदोलन करणार नाही, परंतु मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन होईल त्यामध्ये आम्ही पक्षाचा बिल्ला आणि बॅनर बाजूला ठेऊन सहभागी होऊ. खासदार छत्रपती संभाजीराजे यांना मराठा समाजाला आरक्षण मिळवायचे आहे. त्यांनी त्यासाठी नेतृत्व करावे, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. मराठा आरक्षणासाठी कोणत्याही नेत्याने आंदोलन केले तरी भाजपा पाठिंबा देईल”, असे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे.

राज्य सरकारकडून मराठा समाजाची मुस्कटदाबी !

चंद्रकांत पाटील याबाबत बोलताना म्हणाले की, “कोरोनाचे संकट आहे म्हणून आयुष्य थांबलेले नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यासाठी राज्य सरकारला ४ जूनपर्यंत मुदत आहे. ही मुदत कोरोनामुळे वाढणार नाही व नंतर फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही. मराठा आरक्षणाला स्थगिती येण्यापूर्वी ज्या उमेदवारांची सरकारी नोकरीसाठीची निवड प्रक्रिया पूर्ण झाली होती व नेमणूकपत्र देणे बाकी होते त्यांना ते देण्यातही कोरोनाचा अडसर नाही. मराठा समाजाने आरक्षणासाठी आज रस्त्यावर उतरून संघर्ष नाही केला तर वेळ निघून जाईल. राज्य सरकारकडून कोरोनाच्या काळात बाकी सर्व करायला परवानगी परंतु मराठा समाजाची मुस्कटदाबी चालू आहे. ती लोक सहन करणार नाहीत”, असाही इशारा यावेळी चांदत्रकांत पाटील यांनी दिला आहे.

आम्ही संभाजीराजे छत्रपतींचा सन्मानच केला !

संभाजीराजेंबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपने छत्रपती संभाजीराजे यांचा सन्मान केला आहे. मात्र, संभाजीराजे त्याबाबत कधी बोलत नाही. भाजपा कार्यालयात येऊन अर्ज दाखल करावा लागू नये यासाठी त्यांना राष्ट्रपती नियुक्त खासदार करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला. अलाहाबाद येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत अमित शाह यांनी सत्कार केला. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपाच्या सर्व केंद्रीय मंत्री व राष्ट्रीय नेत्यांनी उभे राहून त्यांचे अभिनंदन केले. केंद्र सरकारच्या कोणत्याही मंत्र्याकडे गेले असता खा. संभाजीराजे छत्रपती यांचा सन्मानच केला जातो. भाजपाच्या राज्य सरकारने छत्रपती संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली रायगड विकास परिषदेची स्थापना केली व त्या कामासाठी मोठा निधी दिला”, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी संभाजीराजेंना सगळ्याची आठवण करून दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना व्हायरसच्या विळख्यातून ९० भारतीय मायदेशी परतले

swarit

पिकविम्याचा लाभ शेतकऱ्यांऐवजी कंपन्यांना

News Desk

“आता मी एकदम ठणठणीत”, डिस्चार्जनंतर गांगुलीची चाहत्यांना साद

News Desk